![]()
.
कन्नड तालुक्यातील शिवराई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी ‘आनंदनगरी’ उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि व्यावसायिक कौशल्यांची रुजवणूक करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आणि खेळांचे स्टॉल्स लावले. पाववडा, सँडविच, गुलाबजाम, समोसे, कांदेपोहे, पाणीपुरी, चटपटीत शेंगदाणे, घरगुती पौष्टिक पदार्थ अशा चविष्ट पदार्थांनी स्टॉल्स गजबजले होते.
विद्यार्थ्यांनी वस्तूंची विक्री करताना नफा-तोटा, हिशेब आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात केले. ‘चला या, ताजे साबुदाणा वडे घेऊन जा’, ‘केवळ पाच रुपयांत आरोग्यदायी नाष्टा’ अशा घोषणांनी परिसरात उत्साह निर्माण झाला. पालकांनी स्टॉल्सना भेट देऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. ‘मुलांना शाळेतच व्यवहारज्ञान मिळत आहे हे पाहून समाधान वाटले,’ अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी १६ हजारांहून अधिक रुपयांची उलाढाल केली. सर्वाधिक नफा कमावणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकदिनी शाळेतर्फे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ‘आम्ही सारे खवय्ये’ या सेल्फी पॉइंटवर पालकांनी फोटो काढत आनंद व्यक्त केला. विविध खेळांचे स्टॉल्सही पालकांचे मनोरंजन करून गेले. उपक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि गावातील मान्यवरांच्या हस्ते झाले. सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक देशपांडे, सहशिक्षक सोनवणे, नवघडे, नलावडे, डोंगरे, घोडमारे यांनी मार्गदर्शन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
