Devendra Fadnavis Pune Plan ₹32000 Crore Thackeray Ajit Pawar | अजितदादांचा संयम ढळलाय, 15 तारखेनंतर शांत होतील: महायुतीमधील ‘मैत्रीपूर्ण’ संघर्षावर फडणवीसांचे भाष्य, ठाकरे बंधुवरही टीका – Pune News



राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, राज्यातील सर्वच बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणेकरांशी संवाद साधला. अभिनेत्री गिरीजा ओक यांनी

.

मुलाखतीदरम्यान ‘देवाभाऊ काय म्हणतायत?’ या प्रश्नावर फडणवीस यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की, “देवाभाऊ काही म्हणत नाहीत, देवाभाऊंचे काम बोलते.” अजित पवार यांच्याकडून होणाऱ्या टीकेबद्दल विचारले असता ते म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रबळ पक्ष असल्याने आम्ही मैत्रीपूर्ण लढत देत आहोत. मी संयम पाळला आहे, पण सध्या दादांचा संयम ढळलेला दिसतोय. १५ तारखेनंतर (मतदानानंतर) ते काही बोलणार नाहीत. सध्या आम्ही एकमेकांविरोधात लढत असलो, तरी प्रचारात मर्यादा पाळणे आवश्यक आहे.”

ठाकरे बंधूंच्या युतीवर टिप्पणी

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीवर बोलताना फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “कोणताही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंदच आहे. राज ठाकरेंनी यासाठी मला क्रेडिट दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दोन भाऊ एकत्र यावेत हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. त्यांनी प्रयत्न केले पण ते एकत्र आले नाहीत, मात्र माझ्यामुळे (राजकीय परिस्थितीमुळे) ते एकत्र आले. यासाठी बाळासाहेब मला आशीर्वादच देतील. पण आता दोन भाऊ-बहीण एकत्र येणार का, हे मला माहीत नाही, ते १५ तारखेनंतर कळेल.”

पुणेकरांना फुकट नको, उत्तम सेवा हवी

अजित पवार यांनी महिलांना मेट्रोतून मोफत प्रवासाचे आश्वासन दिले होते, त्यावर फडणवीस यांनी उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, “मी तर आज जाहीर करणार होतो की पुण्यातून उड्डाण करणाऱ्या महिलांना विमानातून मोफत प्रवास मिळेल! घोषणा करायला काय जाते, पण ते पटले पाहिजे. मेट्रो ही केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त मालमत्ता आहे, तिचे दर ‘फेअर सिस्टम’ ठरवते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याची आश्वासने देणे चुकीचे आहे. पुणेकरांना मोफत काहीही नको आहे, त्यांना रिलायबल, डिपेंडेबल आणि उत्तम सेवा हवी आहे. ही आश्वासनं पुणेकरांना नीट समजली आहेत.”

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ‘पाताळ लोक’चा उतारा

पुण्याच्या भविष्यातील विकासावर बोलताना फडणवीस यांनी ३२ हजार कोटी रुपयांचा भव्य आराखडा मांडला. “पुण्यात खाली आणि वर कुठेही जागा उरली नसल्याने आता आम्ही ‘पाताळ लोक’ म्हणजेच टनेल (बोगदे) तयार करणार आहोत. येरवडा ते कात्रज, पाषाण, कोथरूड, औंध आणि संगमवाडी अशा ५४ किलोमीटरच्या टनेलचे नियोजन पूर्ण झाले आहे. तसेच पुण्यात २३ नवीन उड्डाणपूल उभारले जातील, त्यापैकी ८ पुलांचे काम सुरू झाले असून उर्वरित १५ पुलांचे काम येत्या तीन महिन्यात सुरू होईल. हे पूल असे असतील की पुढील २५ वर्षे ते तोडावे लागणार नाहीत,” असे आश्वासन त्यांनी दिले. नागपूरकरांनी आपल्याला सहा वेळा निवडून दिले असले, तरी पुणे हे आपले अत्यंत आवडते शहर असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

उद्धव ठाकरेंच्या ‘इगो’मुळे मेट्रोचा खर्च वाढला

या मुलाखतीत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. मुंबई मेट्रोच्या आरे कारशेड वादावर बोलताना ते म्हणाले की, “मेट्रो कामाला लोकांचा विरोध नव्हता, तर आमचे मित्र उद्धव ठाकरे यांनाच अडचण होती. आरेची जागा राखीव जंगल नाही, असा स्पष्ट अहवाल असूनही केवळ इगोसाठी त्यांनी कामाला स्थगिती दिली. यामुळे साडेतीन वर्षांचे काम तीन वर्षे पुढे गेले आणि प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांनी वाढला. आम्ही दहापट झाडे लावून ती मोठीही केली, पण ठाकरेंच्या हट्टामुळे जनतेच्या पैशांचे नुकसान झाले,” असा आरोप त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *