![]()
सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या तयारीवरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, साधू-संतांच्या निवासव्यवस्था आणि धार्मिक विधींसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्
.
गिरीश महाजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मोठी झाडे तोडण्याचा कुठलाही प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही मोठी झाडे तोडणार नाही, ही ग्वाही आम्ही अनेकदा दिली आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. आतापर्यंत आंध्र प्रदेशातून सात ते आठ हजार झाडे आणून लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित झाडांची लागवडही सुरू असून, पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या नव्याने लावलेल्या झाडांकडे एकही तथाकथित वृक्षप्रेमी फिरकलेला नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
या वादात राज ठाकरे यांनी आपल्याला ‘लाकूडतोड्या’ संबोधल्यावर महाजन यांनी त्यावरही उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. मी स्वतः 20 हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करतोय. तरीही केवळ टीआरपीसाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी झाडाला मिठी मारल्याचा उल्लेख करत, त्यांना आता उशिरा जाग आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. राज ठाकरे हे सतत काहीही बोलत राहतात, मुख्यमंत्र्यांवरही टीका करतात, मात्र मला लाकूडतोड्या म्हणतात तर बोलू द्या, ते मोठे आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.
राज ठाकरे यांनी नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या सभेत बोलताना गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत खोचक शैलीत हल्ला चढवला होता. संजय राऊत म्हणतात तसं, यांना तपोवनातील झाडं छाटायची आहेत. त्या महाजनपेक्षा तो लाकूडतोड्या बरा होता, जो सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीला भुलला नव्हता, असे म्हणत त्यांनी थेट टोला लगावला. यावरही न थांबता, हे लोक झाडं छाटण्याआधी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि माणसं छाटतात. बाहेरून झाडं मागवून ती आता पक्षात लावली जात आहेत, असा आरोप करत राज ठाकरे यांनी भाजपच्या पक्षवाढीवरही अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे तपोवनातील झाडतोड आणि कुंभमेळा तयारीचा मुद्दा राजकीय केंद्रस्थानी आला.
राज ठाकरे यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी गोदाघाटावर आयोजित भाजपच्या सभेत आपली भूमिका ठामपणे मांडली. तपोवन परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू-संतांच्या पारंपरिक निवासासाठी तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहा ते बारा वर्षांत नैसर्गिकरीत्या उगवलेल्या छोट्या-मोठ्या झाडांवरून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यावरणप्रेमी असल्याचा आव आणणारे काही लोक धार्मिक कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, हे सर्व डाव्या विचारसरणीचे लोक असल्याचा थेट आरोपही महाजन यांनी केला.
याच सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेलाही गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर बोलतात, असा आरोप केला जातो. मात्र, ते विकासाशिवाय काहीही बोलत नाहीत, असे ते म्हणाले. विरोधकांकडे आता बोलण्यासाठी मुद्दे उरलेले नसल्याने निवडणुका जवळ आल्या की, ते पावसाळ्यातील बेडकांसारखे आवाज करायला लागतात, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. यामुळे सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच नाशिकचे राजकारणही तापले
महाजन यांनी पुढे जात ठाकरे ब्रँड आणि महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. मुंबई महापालिकेतील 25 वर्षांचा सत्ताकाळ, कोरोना काळातील कथित घोटाळे आणि सलग निवडणूक अपयशाचा दाखला देत त्यांनी मविआवर टीका केली. ठाकरे असोत, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस, महाविकास आघाडी एकही मोठी महापालिका जिंकू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. लोकांचा विश्वास भाजप महायुतीवर असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्येही तो स्पष्टपणे दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाषणाचा समारोप केला. या संपूर्ण वादामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच नाशिकचे राजकारणही अधिकच तापल्याचे चित्र दिसून येत आहे.
