![]()
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरून जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. नवाब मलिक यांना सोबत घेण्यास भाजपने कडाडून विरोध केला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही भ
.
भाजप आणि शिंदेंचा ठाम विरोध मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक हेच राष्ट्रवादीचे नेतृत्व करणार असतील, तर भाजप राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते आशिष शेलार, अमित साठम आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी मांडली आहे. यावर आता शिंदे गटानेही शिक्कामोर्तब केले आहे. “मलिकांबाबत जी भाजपची भूमिका, तीच आमची भूमिका,” असे शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईत केवळ भाजप आणि शिंदेसेना युती करून मैदानात उतरण्याचे चित्र जवळपास निश्चित झाले आहे.
राष्ट्रवादीची 50 जागांची तयारी एकीकडे मित्रपक्ष विरोध करत असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईची पूर्ण जबाबदारी नवाब मलिक यांच्या खांद्यावरच टाकली आहे. या विरोधाला न जुमानता मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने तातडीची बैठक घेतली, ज्याला झिशान सिद्दीकी आणि सना मलिक उपस्थित होते. महायुतीतून विरोध झाल्यास किंवा युती तुटल्यास राष्ट्रवादीने मुंबईत किमान ५० जागा स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे. महायुतीत राहायचे की नाही, याचा अंतिम निर्णय आता अजित पवार घेणार आहेत.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची बैठक
नवाब मलिक यांच्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवत, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेत 150 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार दोन्ही पक्षांनी व्यक्त केला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, येत्या एक ते दोन दिवसांत जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात गुरुवारी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांची मॅरेथॉन बैठक होणार असून, जागावाटपाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
जागावाटपाचे सूत्र निश्चित करताना, ज्या जागेवर ज्या पक्षाचा विद्यमान नगरसेवक आहे, ती जागा त्याच पक्षाला सोडली जाईल, यावर बैठकीत एकमत झाल्याचे समजते. गरजेनुसार काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे, जागावाटपाच्या चर्चेदरम्यान कोणताही अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ नये आणि महायुतीची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी दोन्ही पक्षांनी अत्यंत सावधगिरीने पावले उचलण्याचा व विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
