नेरपिंगळाई ग्रामसभेत ग्रामस्थांचा तीव्र संताप:रस्ते, पाणी, स्वच्छतेच्या दुर्लक्षावर प्रशासनाला धारेवर धरले




नेरपिंगळाई येथील ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटची ग्रामसभा सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली. ग्रामस्थांनी, विशेषतः तरुणांनी, रस्ते, नाल्या, पाणी आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी गावातील अंतर्गत रस्ते आणि नाल्यांची साफसफाई केवळ कागदावरच झाल्याचा आरोप करण्यात आला. सांडपाणी रस्त्यावर वाहत असतानाही आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचे तरुणांनी म्हटले. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना अजूनही भटकंती करावी लागत असताना, लाखो रुपयांचा निधी नेमका कुठे गेला, असा थेट सवाल सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आला. पाच वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कथित विकास कामांचा हिशेब मागितला असता, ग्रामसभेत समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अनेक कामे केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवून निधीचा गैरवापर झाल्याचा संशय तरुणांनी व्यक्त केला. लोकशाहीतील सर्वोच्च व्यासपीठ असलेली ग्रामसभा सत्ताधाऱ्यांसाठी केवळ औपचारिकताच ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ग्रामपंचायत विकासाच्या घोषणांवर सत्तेत आली होती, मात्र पाच वर्षांत केवळ आश्वासनेच दिली गेल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळेच अखेरच्या ग्रामसभेतही सत्ताधारी जनतेचे समाधान करू शकले नाहीत. नेरपिंगळाईतील ही ग्रामसभा म्हणजे अपयशी सत्तेविरोधातील जनभावनांचा उद्रेक होता, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. तरुणांचा वाढता रोष पाहता, लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांसाठी पोलीस बंदोबस्त मागवावा लागला. ग्रामसभा पोलीस बंदोबस्तात घ्यावी लागणे हे ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचे अपयश असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकशाही संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोपही या सभेत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *