विभागीय महिला लोकशाही दिनात एकही तक्रार नाही:एकूण 10 तक्रारींपैकी केवळ 2 निकाली; 8 प्रकरणांचा निपटारा महिनाभरात करण्याचे निर्देश




अमरावती: तीन महिन्यांच्या खंडानंतर सोमवारी पार पडलेल्या विभागीय महिला लोकशाही दिनात महिलांची एकही तक्रार पोहोचली नाही. या दिनात प्राप्त झालेल्या एकूण दहा तक्रारींपैकी केवळ दोनच प्रकरणे निकाली काढण्यात आली. उर्वरित आठ प्रकरणांमधील तक्रारदारांना पुन्हा येण्याची वेळ येऊ नये, यासाठी ती तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. त्यानुसार आजही याचे आयोजन करण्यात आले होते. या दिनात विविध १० जणांनी आपापल्या तक्रारी नोंदवल्या. यापैकी दोन तक्रारी थेट विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने, आयुक्तांनी त्यावर त्वरित मार्ग काढून योग्य तो आदेश दिला. उर्वरित आठ तक्रारींचा निपटारा एका महिन्याच्या आत करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करणे आवश्यक असते. मागील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनी येऊ नयेत, यासाठी त्यांचे निराकरण करून ती नस्तीबद्ध करण्याचे निर्देश डॉ. श्वेता सिंघल यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. याशिवाय, न्यायप्रविष्ट किंवा अर्धन्यायिक प्रकरणांसंदर्भात तत्काळ अहवाल सादर करण्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयुक्तांनी उपस्थित तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, उपायुक्त संतोष कवडे, उपायुक्त राजू फडके यांच्यासह महसूल, पोलीस, महापालिका, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *