![]()
महानगरपालिकेच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या असून एबी फॉर्मही पुढील दोन दिवसात सर्वच राजकीय पक्षांना भरावे लागणार आहेत. परंतु, महायुतीमध्ये अजून जागावाटप देखील काही ठिकाणी रखडली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच जळगावमध्ये चांगलेच नाराजीनाट्य पाहायल
.
भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात जागांच्या वाटपावरून रविवारी दुपारी 1.20 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक सुरू झाल्यावर अवघ्या 15 मिनिटांतच वातावरण तापले. उभय नेत्यांमध्ये केवळ 15 मिनिटे चर्चा झाली आणि 2.36 वाजता जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून निघून गेले. पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण दोन वेळा बाहेर आले आणि फोनवर चर्चा करून पुन्हा आत गेल्याचे पाहायला मिळाले.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची ही बैठक झाल्यानंतर साधारण सायंकाळी 4.20 च्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना टाळण्यासाठी आपला ताफा दुसऱ्या गेटवर बोलवला. पत्रकार तिकडे जाताच, गिरीश महाजन प्रवेशद्वारातून बाहेर पडले, तर आमदार भोळे आणि चव्हाण मागच्या दाराने निघून गेले. इतके करूनही पत्रकारांनी गिरीश महाजन यांना गाठलेच. यावेळी बोलताना महाजन म्हणाले, अजून चर्चा सुरू आहे, लवकरच अंतिम निर्णय होईल. तसेच गुलाबराव पाटील यांची नाराजी नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बैठक फिस्कटल्याने वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच निवडणूक लढवावी, असे आदेश मिळाले असल्याची माहिती आहे. त्यानुसार भाजपला 50, शिवसेना शिंदे गटाला 20 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
