कराडमध्ये शिवसेनेचे दिनेश कुंभार एका मताने विजयी:भाजपचे तानाजी देवकर यांचा पराभव; ढोकीत ठाकरे गटाला एका मताने तारले




राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड पंचायत समितीची निवडणूक सर्वाधिक चर्चेची ठरली आहे. या चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार दिनेश कुंभार यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. सुरुवातीच्या निकालांनंतर झालेल्या फेरमतमोजणीत कुंभार यांना विजयी घोषित करण्यात आले असून, या एका मताच्या विजयाने कराडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील तांबवे पंचायत समिती गणात फेरमतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार दिनेश कुंभार यांनी भाजपच्या तानाजी देवकर यांचा अवघ्या एका मताने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मतदानाच्या पहिल्या मोजणीत विजयाचा फरक नगण्य असल्याने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला होता, ज्यानुसार निवडणूक प्रशासनाने पोस्टल मतांची पुन्हा एकदा मोजणी केली. या अत्यंत अटीतटीच्या प्रक्रियेत कुंभार यांना 5,286 मते, तर देवकर यांना 5,285 मते मिळाल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेनेने या चुरशीच्या लढतीत अखेर बाजी मारली आहे. ढोकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार एक मताने विजयी धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे यांनी भाजपचे निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या अटीतटीच्या लढतीत समुद्रे यांना 3,187 मते तर काझी यांना 3,186 मते मिळाली असून, प्रशासनाने केलेल्या फेरमतमोजणीनंतरही अमर समुद्रे यांचेच वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, विजयाचा हा निकाल जाहीर करण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत करण्यात आलेल्या विलंबावर बोट ठेवत, समुद्रे यांनी प्रशासनावर राजकीय दबावाखाली काम केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मतमोजणी केंद्रावर वकिलांना बोलवावे लागले, वकिलांनी युक्तिवादानंतर एक मताने विजय झाल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील एकमेव रात्री उशिरा पर्यंत लांबलेला निकाल अखेर अधिकृत जाहीर झाला आहे. रात्री आठ वाजता अमर समुद्रे यांच्या कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्रासमोर जल्लोष केला. एका मताचे महत्त्व शब्दात सांगूच शकत नाही अशी प्रतिक्रिया समुद्रे यांनी दिली आहे. साताऱ्यात त्रिशंकु दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण 65 जागांचे निकाल समोर आले असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाने 19 जागा जिंकून आपले वर्चस्व दाखवले आहे. निवडणूक अहवालानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसला 18 जागा तर शिवसेनेला 15 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला या निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही. इतर नोंदणीकृत पक्षाच्या वाट्याला 1 जागा आली असून, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने जिल्ह्यात ‘त्रिशंकू’ स्थिती निर्माण झाली आहे. या निकालांमुळे सत्तेची सर्व समीकरणे आता 15 जागा जिंकलेल्या शिवसेनेभोवती फिरणार असून, साताऱ्याच्या सत्तेत ते ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असतील हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *