विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


विविध पथकांमार्फत व बैठे पथकाद्वारे कडक नजर; दोषींवर कठोर कारवाई

नांदेड:- जिल्ह्यात उद्या 10 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून ही परीक्षा जिल्ह्यातील 112 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा तणाव अथवा भीती न बाळगता निर्भय वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. परीक्षेदरम्यान 100 टक्के कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा होणार असून यासाठी प्रशासन सज्ज आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून काही केंद्रांवर बैठे पथक तैनात करण्यात आले आहे.

परीक्षेच्या पारदर्शक व सुरळीत आयोजनासाठी झूम सुविधेद्वारे निरीक्षण केले जाणार असून यासाठी दोन नियंत्रण कक्ष, कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आले आहेत. सर्व परीक्षा केंद्रे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आली आहेत. यादरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ, कॉपी किंवा अन्य गैरप्रकार आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

Post Views: 154






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *