![]()
राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 70 हजार पदांची मेगाभरती प्रक्रिया राबवण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि अत्याधुनिक डिजिटल पद्धतीने राबवण्यात येणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या 20 हजार जागांसह विविध विभागांतील इतर 50 हजार पदांचाही समावेश असणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावलीत सुधारणा करण्यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली, ज्यामध्ये मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व महत्त्वाच्या विभागांचे सचिव उपस्थित होते. या बैठकीत भरती प्रक्रियेत केवळ शैक्षणिक पात्रतेऐवजी कौशल्य आधारित भरती आणि कामाच्या स्वरूपानुसार निकषांमध्ये आवश्यक बदल करण्यावर भर देण्यात आला असून, या सुधारित नियमावलीचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. भरती प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार भरती प्रक्रियेतील अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि होणारा विलंब टाळण्यासाठी आता ऑनलाइन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर राज्य सरकारचा विशेष भर आहे. यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिलॉकर प्रणालीचा प्रभावी वापर करून उमेदवारांच्या प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद करण्यात येईल. ज्या धर्तीवर पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाइन पडताळणी यशस्वीपणे केली जाते, त्याच धर्तीवर सरकारी नोकरभरतीमध्येही हे पारदर्शक मॉडेल लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. प्रशासकीय कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये 70 हजार पदांची भरती पूर्ण झाल्यावर प्रशासकीय कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार असून, ही संपूर्ण प्रक्रिया कोणताही पक्षपात किंवा अन्याय न होता पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडेल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तरुणांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी स्वच्छ, वेगवान आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित भरती प्रणाली उभारण्यावर शासनाचा मुख्य भर असून, याद्वारे पात्र उमेदवारांना न्याय मिळवून दिला जाणार आहे. महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाचे मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. इतर राज्यांनीही हे मॉडेल स्वीकारावे, असे निर्देश पंतप्रधानांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात 70 हजार पदांची मेगाभरती!:MPSC कडून 20 हजार पदांची भरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
