नांदगाव पेठ ग्रामसभेत वाद, सीईओ करणार चौकशी:नागरिकांचा आरोप- सरपंच, ग्रामसेवकांनी उत्तरे दिली नाहीत; अधिकाऱ्यांचे म्हणणे- अनावश्यक प्रश्न होते




नांदगाव पेठ येथील ग्रामसभेत नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सभेतून काढता पाय घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी महसूल तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांना निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली आहे. ग्रामसभा हे गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे लोकशाही व्यासपीठ मानले जाते. या ग्रामसभेत सुमारे ४०० नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी विविध विकासकामे, योजना आणि प्रशासकीय बाबींवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, काही प्रश्नांवर स्पष्ट उत्तरे मिळाली नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे. निवेदनानुसार, ग्रामसभा संपण्यापूर्वीच सरपंच कविता डांगे आणि ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे सभागृहातून बाहेर पडल्या. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली. सुमारे १३ हजार मतदार आणि ३० हजार लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या ग्रामसभेतील या घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी केली आहे. त्यांच्या निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दुसरीकडे, ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ग्रामसभा उत्साहात पार पडली आणि नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. सभेचा मुख्य विषयही निकाली काढण्यात आला होता. मात्र, सभा संपल्यानंतर काही तरुणांकडून अनावश्यक प्रश्न विचारले जात असल्याने सरपंचांसह आपण कार्यालयात परतलो. ग्रामसभेतून काढता पाय घेतल्याचा आरोप चुकीचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *