चंद्रपुरात 'हायहोल्टेज' ड्रामा! घडमोडींना वेग:10 नगरसेवक मुंबईकडे रवाना, अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस सत्तेपासून दूर राहणार‌?




चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालानंतर आता सत्तेच्या समीकरणांनी वेगळेच वळण घेतले आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील तीव्र गटबाजीमुळे पक्षाची सत्ता अडचणीत आली आहे. याच संधीचा फायदा घेत भाजपने सत्तेसाठी हालचाली सुरू केल्या असून, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष असे एकूण १० नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले आहेत. हे नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता असल्याने चंद्रपुरात मोठा राजकीय उलटफेर होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमध्ये महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादाला कंटाळून शिवसेना ठाकरे गटाचे ६, वंचित बहुजन आघाडीचे २ आणि २ अपक्ष नगरसेवकांनी मुंबईची वाट धरली आहे. या १० नगरसेवकांनी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली असून, आता ते मुंबईत दाखल होत आहेत. काँग्रेसकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने हे नगरसेवक भाजपला साथ देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सत्तेचे गणित: भाजप बहुमताच्या जवळ? चंद्रपूर महापालिकेत बहुमतासाठी ३४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीतील आकडेवारी पाहता भाजप मोठी झेप घेताना दिसत आहे. भाजपकडे २३, ठाकरेंची सेना ६, वंचित बहुजन आघाडी २, अपक्ष २ यांसह शिंदे गट १, बसपा १ या सर्वांची बेरीज झाल्यास भाजप ३४ चा मॅजिक फिगर गाठून काँग्रेसला महानगरपालिकेतील सत्तेपासून दूर ठेवू शकते. काँग्रेसमध्ये ‘गृहयुद्ध’; प्रदेशाध्यक्षांची मध्यस्थी काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीसाठी दोन्ही गटांनी स्वतंत्र दावे सादर केल्याने गोंधळ उडाला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केल्यानंतर वडेट्टीवार यांनी काहीशी नमती भूमिका घेत धानोरकर यांना सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करण्यास सांगितले. खासदार धानोरकर यांनी ३१ नगरसेवक आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात १० नगरसेवक मुंबईकडे गेल्याने त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चंद्रपुरात भाजपचाच महापौर बसणार – परिणय फुके भाजप आमदार परिणय फुके यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना आत्मविश्वासाने सांगितले की, “चंद्रपुरात १०० टक्के भाजपचीच सत्ता येईल. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे त्यांचे नगरसेवक अस्वस्थ आहेत आणि शहराला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेसचा एक गट फुटून आमच्याकडे येऊ शकतो.” विरोधकांच्या या अस्वस्थतेचा फायदा भाजपला मिळेल, असा ठाम विश्वास फुकेंनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *