![]()
दुबईस्थित अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्सचे अध्यक्ष आणि मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली अपेक्षा व्यक्त केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था पुढील दोन-तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थसत्ता बनू शकेल, असे ते म्हणाले. मात्र, अनिवासी भारतीयांकडून भारतात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतातील रिटेल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात अधिक ठोस उपाययोजनांची आवश्यकता होती, असे मत त्यांनी मांडले. अर्थसंकल्पाचे स्वागत करताना डॉ. दातार म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड ताकद देण्याची सुप्त क्षमता रिटेल क्षेत्रात आहे. परंतु, सध्या या क्षेत्रात व्यावसायिक कमी आहेत आणि उच्च करांमुळे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून सरकारने व्यावसायिक आणि सर्वसामान्यांवरील करांचे ओझे कमी करावे, अशी सूचना त्यांनी केली. डॉ. दातार यांनी अनिवासी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायांना भारतातील रिटेल क्षेत्रात थेट गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, भारतातील प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत रिटेल बाजारपेठेत व्यावसायिकांची संख्या पुरेशी नाही. परदेशात भारतीय व्यवसाय करतात, पण देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत नाही आणि स्थानिक वेतनमानही आकर्षक नसते. यावर उपाय म्हणून, अनिवासी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायांना भारतीय रिटेल क्षेत्रात आकर्षित करून कर सवलती दिल्यास तसेच परकीय थेट गुंतवणुकीस (एफडीआय) प्रोत्साहन दिल्यास नव्या नोकऱ्या निर्माण होतील. यामुळे कर्मचाऱ्यांना चांगले वेतन मिळेल, व्यावसायिकांची संख्या वाढेल आणि स्पर्धात्मकतेमुळे वस्तूंच्या किमती कमी होऊन सर्वसामान्यांना त्या स्वस्तात मिळतील, असे डॉ. दातार यांनी स्पष्ट केले. अनेक अनिवासी भारतीय जगभरात उत्तम व्यवसाय करतात, पण भारतात गुंतवणुकीस राजी होत नाहीत, हे चित्र बदलणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. भारतातील रिटेल क्षेत्रात प्रचंड सुप्त सामर्थ्य आहे आणि आगामी काळ भारतासाठी अत्यंत आश्वासक आहे, असे डॉ. दातार यांनी नमूद केले. काही वर्षांपूर्वी भारत खरेदीदारांची बाजारपेठ (बायर्स मार्केट) होता, तो आज विक्रेत्यांची बाजारपेठ (सेलर्स मार्केट) बनला आहे, असे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात अनिवासी भारतीय, रिटेल गुंतवणुकीसाठी ठोस उपाय हवे होते.:मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांची अपेक्षा; तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्यास मदत होईल
