![]()
वऱ्हा येथील तलाठी कार्यालयात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वऱ्हा महसूल मंडळात समाविष्ट असलेल्या २० गावातील शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. गेल्या वर्षी १६ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वऱ्हा महसूल मंडळातील २० गावांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, ई-केवायसी न झाल्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. याच पार्श्वभूमीवर हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी दादासाहेब दरोडे आणि तिवसा तालुका दंडाधिकारी मयुर कळसे उपस्थित होते. त्यांनी वऱ्हा मंडळातील २० गावातील शेतकऱ्यांना ई-केवायसी सोबतच ई-पीक पाहणीबाबतही सविस्तर माहिती दिली. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी होती, त्यांना याच शिबिरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी सेतू सुविधा केंद्रही कार्यान्वित करण्यात आले होते. यावेळी पोलीस पाटील सुरेशभाऊ क्षीरसागर, सरपंच निलिमाताई समरित, सेतू सेवा केंद्राचे संचालक सागरभाऊ उताणे, मंडळ अधिकारी संजय ढोक, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र परतेती (वऱ्हा), सुरज गेडाम (धोत्रा), शुभांगीताई आठवले (अनकवाडी), ग्रामविकास अधिकारी एस. ए. केने, महसूल सेवक मनीष कोरडे, श्रद्धाताई भोबे, अवधूत चव्हाण, राजेंद्र सपाटे, उमेश तायडे, मुरली इंगोले यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.
वऱ्हा तलाठी कार्यालयात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी e-KYC सोय:मदतीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी विशेष शिबिर आयोजित
