सांगारेड्डीजवळ भीषण अपघात; नांदेडच्या एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू


नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड–हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-161) वर तेलंगणातील सांगारेड्डी जिल्ह्यातील बचोपल्ली परिसरात मंगळवारी पहाटे सुमारे ३.४० ते ४.०० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात नांदेडच्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तसेच संबंधित कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना नदीम इशायती, त्यांच्या मातोश्री शमीमा बेगम आणि चार वर्षीय कन्या अनबिया तस्नीम हे उमराह करून परतणाऱ्या नातेवाईकांना आणण्यासाठी हैदराबादकडे कारने जात होते. सांगारेड्डी जिल्ह्यातील बचोपल्लीजवळ अचानक एक दुचाकी वाहन समोर आल्याने चालकाने वाहनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचा ताबा सुटल्याने ती रस्त्यावरून घसरून तब्बल तीन ते चार वेळा पलटी झाली.

या भीषण अपघातात मौलाना नदीम इशायती, शमीमा बेगम आणि अनबिया तस्नीम यांचा जागीच मृत्यू झाला. कारचा चालक नवीद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत शमीमा बेगम या आंध्र महाराष्ट्र फ्रूट कंपनीचे अयुबभाई यांच्या भावजय असल्याचे समजते. नांदेड शहरातील देगलूर नाका, खुबा मशिद परिसरात या घटनेची माहिती समजताच शोककळा पसरली असून नातेवाईक व नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अपघातग्रस्त कारचा क्रमांक MH 06 AN 7306 असा असून, या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *