सिंधुदुर्गात भाजप-महायुतीचा 'बिनविरोध' धमाका!:11 जागांवर विरोधकांची माघार, भाजपचे 10 तर शिंदे सेनेचा 1 उमेदवार विजयी




नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप-महायुतीचा ‘बिनविरोध’ पॅटर्न पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत आज महायुतीने विरोधकांना मोठा धक्का दिला असून, तब्बल ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे १० आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. सिंधुदुर्ग हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मूळ जिल्हा असून, येथे खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचा मोठा प्रभाव आहे. राणे पिता-पुत्रांच्या राजकीय व्यूहरचनेमुळे जिल्ह्यातील अनेक जागांवर विरोधकांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २७ जानेवारीपर्यंत असली तरी, त्यापूर्वीच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित झाला आहे. विशेषतः कणकवली आणि देवगड या बालेकिल्ल्यांमध्ये विरोधकांनी चक्क ‘नांग्या’ टाकल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या कोणत्या जागा बिनविरोध? जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर ५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये खारेपाटणमधून भाजपच्या प्राची इस्वलकर, देवगड तालुक्यातील पडेलमधून सुयोगी रवींद्र घाडी, बापर्डेमधून अवनी अमोल तेली आणि बांदा मतदारसंघातून प्रमोद कामत या भाजप उमेदवारांनी बाजी मारली आहे, तर जानवली जिल्हा परिषद गटातून शिंदे सेनेच्या रुहिता राजेश तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. पंचायत समितीत भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध पंचायत समिती गणांमध्येही महायुतीने सहाही जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, हे सर्व उमेदवार भाजपचेच आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यातील बिडवाडी गणातून संजना संतोष राणे आणि वरवडे गणातून राजेश (सोनू) सावंत यांचा समावेश आहे. देवगड तालुक्यात पडेलमधून अंकुश यशवंत ठूकरूल, नाडणमधून गणेश सदाशिव राणे आणि बापर्डे गणातून संजना संजय लाड यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. तसेच वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गणातून साधना सुधीर नकाशे या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत. या सर्व जागांवर विरोधकांनी दिलेले आव्हान माघारी घेतल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २७ जानेवारीला आणखी धक्के बसणार? पालकमंत्री आणि स्थानिक नेत्यांनी उर्वरित ४५ जागांवरही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. हा विजय म्हणजे जनतेचा राणे कुटुंबीयांवरील विश्वास आणि महायुतीच्या कामाची पावती आहे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २७ जानेवारी रोजी आणखी काही ठिकाणी विरोधक माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *