![]()
ॲड. मानसी चव्हाण यांनी भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘भारतीय संविधान आणि आपण : ओळख, अर्थ आणि पाया’ या त्यांच्या नव्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या उपक्रमाद्वारे त्यांनी प्रत्येक घरात, प्रत्येक कार्यालयात आणि प्रत्येक वर्गखोलीत संविधानावर आधारित किमान एक तरी पुस्तक असावे, असा प्रभावी संदेश दिला आहे. ॲड. चव्हाण यांच्या मते, संविधान ही केवळ कायद्याची किंवा न्यायालयांची संकल्पना नसून ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली आहे. मात्र, संविधानाची भाषा, अर्थ आणि उपयोग याबाबत सामान्य नागरिकांसाठी सुलभ व व्यवहार्य माहिती सहज उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. हे पुस्तक केवळ वकील किंवा संविधानतज्ज्ञांपुरते मर्यादित नाही. विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक, कुटुंबे, शेतकरी, कामगार, गृहिणी तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांसाठीही ते उपयुक्त ठरेल, असे ॲड. चव्हाण यांनी स्पष्ट केले. ॲड. मानसी चव्हाण या कार्यरत वकील आणि संविधानिक कायद्याच्या संशोधक आहेत. त्या नागरी शिक्षण आणि सार्वजनिक कायदेविषयक जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या मते, संवैधानिक साक्षरता केवळ वर्गखोल्या, न्यायालये किंवा औपचारिक भाषणांपुरती मर्यादित न राहता, मूल्यांची जडणघडण होणाऱ्या घरांमध्ये, निर्णय घेतले जाणाऱ्या कार्यालयांमध्ये आणि नागरिकत्वाची पायाभरणी होणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचली पाहिजे. या अनुषंगाने, प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण समारंभांमध्ये या पुस्तकाची ओळख करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालये, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संघटना, तसेच स्थानिक सभा व नागरी मंचांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे केवळ प्रतीकात्मक उत्सव साजरा न करता, लोकशाही मूल्यांप्रती आपली बांधिलकी अधिक अर्थपूर्ण पद्धतीने अधोरेखित करण्याची संधी मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
संविधान भेट द्या, संवैधानिक साक्षरता वाढवा:ॲड. मानसी चव्हाण यांच्या 'भारतीय संविधान आणि आपण' पुस्तकाचे प्रकाशन
