ढोल-ताशा परंपरेच्या संवर्धनासाठी नियमांची अंमलबजावणी आवश्यक:परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांचे मत




ढोल-ताशा वादनाची परंपरा आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तरच अधिकाधिक युवकांना या संस्कृतीत सहभागी होता येईल आणि तिचा व्यापक प्रसार होईल, असे मत परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी व्यक्त केले. सहकार नगरमधील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर शिवगर्जना ढोल ताशा ध्वज पथकाच्या रौप्य महोत्सवी वर्ष वाद्यपूजन आणि सराव शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उद्योजक विजय पवार, पोलिस उपायुक्त संभाजी कदम, शिरीष मोहिते, ॲड. कुणाल टिळक, महेंद्र शर्मा, अमित गायकवाड, विश्वास भोर, रंजना साळुंके, पथकाचे अध्यक्ष ललित पवार, महेश गोखले, ओंकार होले, बिंदू ढोले पाटील, गणेश शिर्के आणि अजय साळुंके उपस्थित होते. कृषिकेश रावले यांनी यावेळी डीजेचा वापर कमीत कमी दोन स्पीकर्सपुरता मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले. ढोल-ताशा पथकांनाही आवश्यक ती मर्यादा असावी आणि एका पथकात सुमारे ५० सदस्यांची मर्यादा ठेवावी, असे ते म्हणाले. तसेच, ढोल-ताशा सरावासाठी निश्चित वेळा ठरवून त्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवगर्जना हे शिस्त पाळणारे पथक असल्याचेही त्यांनी सांगितले. अण्णा थोरात यांनी शिवगर्जना वाद्य पथक यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असल्याबद्दल अभिनंदन केले. कोणतीही संस्था स्थापन करणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच ती दीर्घकाळ टिकवून ठेवणे अधिक कठीण असते. शिवगर्जना वाद्य पथकाने गेली २५ वर्षे सातत्याने आपले कार्य सुरू ठेवले, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले. सर्वांनी शिस्तीचे पालन करून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, तसेच गणेश विसर्जन मिरवणुका शक्य तितक्या लवकर पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार म्हणाले की, लोकमान्य टिळक आणि रंगारी बंधूंनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात समाजप्रबोधन आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या उद्देशाने केली होती. त्या मूळ हेतूला कोणत्याही प्रकारे बाधा पोहोचू नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. ढोल-ताशा वादनातून निर्माण होणारे चैतन्य कर्णमधुर आणि संस्कृतीला पूरक असावे. आपल्या समृद्ध परंपरेचे जतन करताना संस्कृतीचे रूपांतर विकृतीत होणार नाही, याची सर्वांनी जबाबदारीने दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. महेश गोखले यांनी सांगितले की, शिवगर्जना ढोल-ताशा व ध्वज पथक यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. गेली २५ वर्षे पथकाने सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक मूल्ये जपत कार्य केले आहे. यापुढेही पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाच्या परंपरेचा सन्मान राखत शिस्तबद्ध गणेशोत्सवासाठी पथक कटिबद्ध राहील. नव्या पिढीपर्यंत ढोल-ताशा वादनाची समृद्ध परंपरा पोहोचविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *