![]()
देवेंद्र फडणवीस केंद्रीय स्तरासाठी अतिशय योग्य नेतृत्व आहेत. महाराष्ट्र त्यांच्या हातात राहिलेला नाही, महाराष्ट्रात गुंडाचे राज्य आले आहे. आम्ही तर म्हणू की 2029 पूर्वी त्यांनी पंतप्रधानपद मिळवावे. जर एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये आपला गट विलीन केला आणि म्हणाले की मीच भाजप स्थापन केला आणि देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा माझे कार्यकर्ते होते तर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकेल पण बाहेर राहून त्यांना हे पद मिळणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत. शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला. मराठी स्वाभिमानी शिवसेना फोडली म्हणून त्यांना मुख्यमंत्री केले होते. आता त्यांचे काम संपले आहे, त्यांच्या कार्याचा अहवाल त्यांनी काल सादर केला आहे. पण आता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार नाही. केंद्रात जर बदल झाले आणि पंतप्रधान मोदींना वाटले की देवेंद्र फडणवीस एखाद्या प्रमुख खात्याचे नेतृत्व
करण्यासाठी योग्य आहेत विभागासाठी योग्य आहेत. त्यांना अर्थखाते किंवा अन्य महत्त्वाचे खाते मिळाले तर महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होईल. भाजपचे लोकं बाहेरचा मुख्यमंत्री का करतील? त्यांची तशी परंपरा नाही. एकदा त्यांनी शिंदेंना हे पद दिले ते पण पक्ष फोडण्यासाठी. भाजपचे लोकं गोमातेच्या टाळूवरचे लोणी खातात संजय राऊत म्हणाले की, भाजपचे लोकं मृत गोमातेच्या टाळूवरचे लोणी खातात. 100 कोटी रुपयांच्यावर मृत गायींवर घेतलेले अनुदान हा गंभीर विषय आहे. सरसंघचालक भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत आहेत? हिंदुत्वाच्या नावाने लुट सुरू आहे. या सर्व गोशाळेची नावे श्रीराम आणि श्री कृष्णाच्या नावाने आहेत. माझ्याकडे संपूर्ण यादी आहे. हे कोणत्या प्रकारचे हिंदूराष्ट्र आहे? असे हिंदूराष्ट्र आम्हाला नको, असे राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईत मराठी माणसांना त्रास का होत आहे? संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती अशी विधाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरात केली आहेत. जर महाराष्ट्रात मराठीची सक्ती असेल तर मुंबईमध्ये मराठीत बोला असे सांगणाऱ्या मराठी माणसांना त्रास का होत आहे? याचे उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. जर त्यांचा मराठी आत्मा आणि स्वाभिमान जिवंत असेल तर.
देवेंद्र फडणवीस केंद्रीय स्तरासाठी योग्य नेतृत्व:2029 पूर्वी त्यांनी पंतप्रधान व्हावे, भाजपचे लोक मृत गोमातेच्या टाळूवरचे लोणी खातात- संजय राऊत
