![]()
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांचे मागील रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मागील सहा महिन्यांत बदली झालेल्या
.
मागील निवडणुकीदरम्यान ज्या भागांमध्ये पैसे वाटप झाले होते, त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची यंदा इतरत्र बदली करण्यात आली असली तरी, त्याच प्रकारचे गैरप्रकार पुन्हा सुरू असल्याचा आरोप डॉ. गोऱ्हे यांनी केला. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांची मोक्याच्या ठिकाणी बदली करण्यात येत असून, पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर गस्त घालावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले. अन्यथा संघर्ष वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. पैसे वाटून निवडणूक जिंकता येत नाही, असे असते तर काँग्रेस कधीच हरली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला. पैसे वाटपाबाबत शिवसेनेने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी निवडणूक आयोगाला आवाहन केले की, मतदारांना मतदान केंद्रात मतपत्रिका देताना मतदानाची प्रक्रिया नीट समजावून सांगावी. यामुळे मतदारांना योग्य पद्धतीने मतदान करण्यास मदत होईल, असे त्यांचे म्हणणे होते.
पुणे महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, शिवसेनेने आरोप-प्रत्यारोप न करता विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. पुण्याला समाजसुधारकांचा मोठा वारसा असून, पुणेरी संस्कृती जपण्यासाठी पक्ष प्रयत्नशील राहील. शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असताना काही राजकीय पक्षांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पुणे शहर आणि जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढत असून, गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. शहराच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ‘ब्ल्यू प्रिंट’ला मनपेत यश मिळाल्यानंतर चालना दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. शाळा, आरोग्य सुविधा, पायाभूत सोयी आणि समाविष्ट गावांतील दुहेरी कराबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
‘लाडकी बहीण’ योजनेबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी माहिती दिली की, डिसेंबर महिन्यात योजनेचे पैसे दिले जातील आणि त्याला निवडणूक आयोगाची कोणतीही आडकाठी नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१०० रुपये देण्याची घोषणा केली असून, महायुती सरकार राज्यातील अडीच कोटी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
