Raj Thackerays Sharp Criticism of CM Devendra Fadnavis | Maharashtra Politics | फडणवीस स्वतःच्या हिंमतीवर झालेले मुख्यमंत्री नाहीत: ‘बसलेला अन् बसवलेला यात फरक असतो’ म्हणत राज ठाकरे यांची तिखट टीका – Maharashtra News



भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या हिंमतीवर झालेले मुख्यमंत्री नाही. बसलेला अन् बसवलेला यात मोठा फरक असतो, अशी अत्यंत तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मंगळवारी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना केली.

.

गौतम अदानी उद्या देशालाही वेठीस धरतील:मुख्यमंत्र्यांनाही हे माहिती, पण सांगतील कुणाला? राज ठाकरेंचा CM देवेंद्र फडणवीसांना टोला

राज्यात मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांचा फड रंगला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 15 तारखेला प्रत्यक्ष निवडणूक होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे स्वतःच्या हिंमतीवर मुख्यमंत्री झाले. पण देवेंद्र फडणवीस यांचे तसे नाही.

साधी गोष्ट आहे. एक माणूस मुख्यमंत्री होता. निवडणूक संपल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर शिवसेना फोडण्यात आली. मग निवडणूक झाली आणि संपली. मग एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यांनी ते स्वीकारले. एखादा बसलेला माणूस असता, ठाम असता तर त्याने नकार दिला असता. पण बसलेला व बसवलेला यात फरक असतो. भाजप जो आम्ही पूर्वीपासून पाहत आलो आहोत, तो आज उरलेला नाही. भाजपचे लोकही ही गोष्ट मान्य करतात, असे राज ठाकरे म्हणाले.

आमची शहरे का बळकावता?

राज ठाकरे यांनी यावेळी हिंदी सक्तीच्या मुद्यावरूनही भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, आपला मूळ देश असा नव्हता. आज ज्यांना आपण राज्य म्हणतो, ते कधीकाळी वेगवेगळे देशच होते. हा 1947 साली अस्तित्वात आलेला देश आहे. प्रत्येक राज्याची एक भाषा व संस्कृती आहे. वेगवेगळे सणवार आहेत. अहमदाबाद व गांधीनगर यांचा विकास मुंबईसारखा करा ना. आम्हालाही हेवा वाटेल. आनंदही वाटेल. आमची शहरे का बळकावता? खरी संपत्ती ही तुमची जमीन आहे. तुमची भाषा व जमीन विकली गेली तर तुमचे अस्तित्व संपेल, असे राज ठाकरे यावेळी मुंबईतील मराठी भाषिकांना इशारा देताना म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, भाजपने नवी मुंबईतील जाहीरनाम्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. काय सांगायचे आहे त्यांना? हिंदुत्वाच्या नावाखाली माझे मराठीपण घालवू नका. तुमची राज्य तुम्ही सांभाळा. हिंदुत्वाच्या बुरख्याखालून लढू नका. काय चाललंय हे आम्हाला माहिती आहे. अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जातात ते काय हिंदुत्त्वाच्या नावाखाली जातात का?

बुलेट ट्रेनलाही केला कडाडून विरोध

राज ठाकरे यांनी यावेळी बुलेट ट्रेनलाही कडाडून विरोध केला. ते म्हणाले, बुलेट ट्रेन अजिबात व्हायला नको. आपण जपानकडून पावणेदोन लाख कोटींचे कर्ज घेतले आहे. 3 हजार रुपये तिकीट व अमुक एक फेऱ्या ठेवल्याशिवाय ही बुलेट ट्रेन परवडणार नाही. लांबचा पल्ला आहे तर ठीक आहे. तिथे बुलेट ट्रेन आणायची असते. मुंबई ते अहमदाबादला किती ट्रेन जातात? त्यातील 40 ते 50 टक्के ट्रेन रिकाम्या जातात. मग बुलेट ट्रेन आणून काय होणार आहे? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *