नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात वाचन संस्कृती न रुजण्याची अनेक कारणे सांगितली जातात. यावर अनेकांनी आकलन केले असून असे दिसून येते की आपण प्रमाणभाषा जास्त फोकस केली आहे. कोणत्याही भाषेचा मेन गाभा त्या भाषेतील लवचिकता, साधेपणा, सौंदर्य आहे. भाषेचा लिंग्विस्टिक न्यूनगंड विकसित होता कामा नये. अलीकडे भाषेमधून लवचिकता, साधेपणा कमी होत चालला आहे आणि बोलीभाषा फोकस न केल्याने वाचन संस्कृती रुजत नसल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवारी येथे बोलताना व्यक्त केले.
नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान द्वारा ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत नररहर कुरुंदकर यांच्या 44 व्या स्मृतिदिनानिमित्त वाचन: साद आणि प्रतिसाद विषयावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी अनौपचारिक संवाद या कार्यक्रमाचे आयोजन सायन्स महाविद्यालयाच्या पुरणमल लाहोटी सभागृहात करण्यात आले होते. व्यासपीठावर संवादक डॉ. विश्वाधार देशमुख यांची उपस्थिती होती. या संवाद कार्यक्रमात डॉ. विश्वाधार देशमुख यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना त्यांचा वाचन प्रवास, वाचनाचे महत्त्व, वाचन संस्कृतीचा विकास आणि ऱ्हास आदीवर प्रश्न विचारून बोलते केले. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी काय करता येईल यावर बोलताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की जसे फिल्म अँप्रिसिएशनचे कोर्स असतात तसेच साहित्य अॅप्रिसिएशनचे कोर्सेस असायला पाहिजे जेणेकरून साहित्यातील सौंदर्य उलगडेल, साहित्यातील श्रेष्ठ कलाकृती व रसग्रहण माहिती मिळेल. साहित्य वाचनाने जीवनाला रस येतो नाहीतर कोरडेपणा राहतो. वाचनातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो भाषा घडविण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगून दलित आत्मकथांमध्ये प्रचंड ताकद आहे. दलित आत्मकथा म्हणजे वैचारिक क्रांतीच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केले.
पुढे बोलताना आपली वाचनाची आवड कशी विकसित होत गेली हे सांगताना जिल्हाधिकारी कर्डिले यांनी आपले वडील शिक्षक असल्याने ग्रंथालयातून पुस्तक आणायचे यामुळे घरामध्ये वाचनाचे चांगले व्यासपीठ तयार झाले व वाचनाची आवड निर्माण झाल्याने सलून मध्ये जाऊन पेपर वाचल्याची आठवण ही सांगितली. सध्या मोबाईलच्या युगात तरुणांमध्ये वाचन संस्कृती लोप पावत असल्याचे दिसून येते. यावर बोलताना ते म्हणाले की सध्याचा काळ कठीण आहे आजच्या तरुणाईवर मोबाईलचे आक्रमण झाले असून मेंदूवर रिल्सने बंबार्डिंग होत असल्याचे म्हणाले. या अनौपचारिक संवादात जिल्हाधिकारी कर्डिले यांनी यशवंतराव चव्हाण, नारायण सुर्वे, ग्रेस व वपू काळे, विंदा करंदीकर आदी लेखक, कवींची पुस्तके वाचल्यांचे संदर्भ दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालासाहेब पांडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शामल पत्की यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 5
