राज्यातील आठ सीईओंना सेवाकर्मी पुरस्कार:हिंगोलीच्या विवेक गायकवाड यांचा समावेश




राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 150 दिवसाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या आठ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सेवाकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यामध्ये हिंगोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार यांचा समावेश आहे राज्य शासनाने 150 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषदांसह विविध विभागांना त्या त्या विभागांतर्गत कामांचे निकष ठरवून दिले होते. यामध्ये प्रामुख्याने ई ऑफिस, कर्मचारी पदोन्नती, प्रलंबित कामांचा निपटारा, बिंदू नामावली अद्यावत करणे, सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे, प्रलंबित प्रकरणे मुदतीमध्ये निकाली काढणे या इतर कामांचा समावेश होता. त्यानुसार हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजात अमुलाग्र बदल केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव
गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका राजपूत, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या मदतीने सर्वप्रथम जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालय मध्ये ई ऑफिस प्रणाली राबविण्यात आली. याशिवाय मागील अनेक दिवसापासून रखडलेल्या पदोन्नत्या मार्गी लावल्या. कार्यालयीन कामकाजामध्ये शिस्त यावी यासाठी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आली. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहू लागले आहेत. याशिवाय प्रत्येक विभागाने त्या त्या कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित कामांचा निपटारा केला याशिवाय कागदपत्रांचे अ, ब, क, ड वर्गीकरण देखील केले. तसेच कार्यालयातील कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. दरम्यान अंतर्गत मूल्यमापनामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेला शंभर पैकी 80 गुण मिळाले आहेत. यासोबतच राज्यातील इतर आठ जिल्हा परिषदांना देखील 80 गुण मिळाले आहेत. या गुणांच्या आधारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना सेवाकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच छत्रपती संभाजी नगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत नागराजन, ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचाही या पुरस्कारामध्ये समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *