जेन झी चा दणका, प्रधानजींचा पत्ता कट! – VastavNEWSLive.com


सत्तेचा माज आणि पोरांचा माज; जेव्हा जेन झी समोर दिल्ली झुकली!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) –  गेल्या १२ वर्षांत जे काम देशातील दिग्गज विरोधी पक्षांना जमले नाही, ते काम हातात महागडे मोबाईल आणि डोळ्यांत भविष्याची स्वप्ने असलेल्या जेन झी (Gen Z) पिढीने अवघ्या ३० दिवसांत करून दाखवले आहे. आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ज्या शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचे वाळवी लागली होती, त्या विभागाचा बळी देऊन सरकारने सध्या तरी स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रश्न हा उरतोच की, ज्या धर्मेंद्र दादांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा केला, त्यांचे आता पुन्हा कोणत्या राज्यात ‘पुनर्वसन’ होणार?

वॉटर कॅननमध्ये होळी आणि अश्रूधुरात पिकनिक! या आंदोलनाचे सर्वात विलोभनीय आणि बोचरे वैशिष्ट्य म्हणजे या पिढीने दहशतीला उत्सवात बदलले. पोलिसांनी जेव्हा आंदोलकांवर वॉटर कॅननचा मारा केला, तेव्हा ही मुले पळून गेली नाहीत; उलट त्यांनी त्यात होळी साजरी केली. जेव्हा पोलिसांनी अश्रूधुराचे गोळे सोडले, तेव्हा काय साहेब, एवढेच? काही नवीन व्हरायटी आहे का? असे प्रश्न विचारून त्यांनी सत्तेच्या क्रूरतेला थट्टेवारी नेले. पोलिसांनी मारहाण करायच्या आधी ही पोरं विचारत होती, थांबा, दोन मिनिटे प्रोटिन पिऊन घेतो, म्हणजे ताकद जास्त असेल! ज्यांना सत्तेने नाजूक समजले होते, त्यांनी खिळे ठोकलेल्या दंडुक्यांचा आणि पॅलेट गनचा मार खाऊनही मैदा सोडले नाही.

होळी रक्ताची की न्यायाची? हे आंदोलन केवळ घोषणाबाजीपुरते मर्यादित नव्हते. यामागे नीट पेपर लीकमुळे उद्ध्वस्त झालेली स्वप्ने आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनींचा आक्रोश होता.आंदोलक आजही मागणी करत आहेत की, ज्यांनी पेपर लीकमुळे आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. आज एक मुलगी अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे, तर एकीला नुकतेच व्हेंटिलेटरवरून बाहेर काढले आहे. पॅलेट गनच्या मारामुळे अनेकांच्या डोळ्यांची दृष्टी कायमची जाण्याची भीती आहे. हा सर्व ड्रामा नाही, तर हा हिशोब आहे जो आता ही तरुण पिढी सरकारकडून व्याजासह वसूल करत आहे.

सोनम वांगचुक यांचा नवा विक्रम आणि चिमुरड्यांची साथ या आंदोलनात केवळ तरुणच नव्हते, तर सोनम वांगचुक यांनी तब्बल २५ दिवस उपोषण करून महात्मा गांधींचा २१ दिवसांचा विक्रमही मोडला. इतकेच नाही, तर नववीत शिकणारा एक मुलगा आपल्या भावांसाठी घरून पळून या आंदोलनात सामील झाला.घरी विचारले असते तर येऊ दिले नसते, इथे माझ्या भावांची सेवा करतोय आणि जे मिळेल ते खातोय,हे त्याचे शब्द सत्तेच्या खुर्चीत बसलेल्यांना लाजवणारे आहेत.

पामेरियन मीडिया आणि बंद झालेले इंटरनेट जगातील कोणत्याही आंदोलनापेक्षा हे वेगळे ठरले कारण या पिढीने सरकारचे मुख्य अस्त्र असलेला पामेरियन मीडिया (गोदी मीडिया) आपल्या परिसरात फिरूच दिला नाही.जेव्हा सरकारने स्वगी (Swiggy) आणि झोमॅटो (Zomato) डिलिव्हरी बंद केली, इंटरनेट कापले, तेव्हा ही मुले अधिक आक्रमक झाली. परदेशातील लोकही या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे आले, हे पाहून शेवटी १२ वर्षांत पहिल्यांदाच सरकारला झुकावे लागले.

राजीनामा की रवानगी? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे विजय आहे की सोयीचे राजकारण? चर्चा अशी सुरू आहे की, ज्या माणसाने शिक्षण विभागात घोटाळा केला, त्यांना आता ओडिशाचे मुख्यमंत्री करून पूर्ण राज्य विकण्याचे अधिकार दिले जाणार का? शिक्षण विभागाचा नवीन सचिवही भ्रष्टाचारीच दिल्याची टीका आता होऊ लागली आहे.

अजून लढाई बाकी आहे… जैन जीने (Gen Z) स्पष्ट केले आहे की, फक्त एका राजीनाम्याने हे आंदोलन थांबणार नाही. ज्या पोलिसांनी २० तारखेला विनाकारण मारहाण केली, खिळे लावलेले दंडुके वापरले, त्यांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही आणि दाखल केलेले गुन्हे जोपर्यंत मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत ही पिढी शांत बसणार नाही.

या आंदोलनाने सिद्ध केले आहे की, भारतात आजही लोकशाही जिवंत आहे आणि ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी अशा पिढीने घेतली आहे, जी दहशतीला हसून उत्तर द्यायला शिकली आहे. आता सरकार पुढे काय काय करते आणि ही जेन झी सत्ताधाऱ्यांना आणखी किती वाकवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *