भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय बेकायदेशीर:महाशिवरात्रीला मंदिर खुले ठेवण्याची पतित पावन संघटनेची मागणी




पतित पावन संघटनेने भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर महाशिवरात्रीला बंद ठेवण्याच्या निर्णयाला ‘बेकायदेशीर’ ठरवले आहे. संघटनेने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेऊन मंदिर खुले ठेवण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल घेत महाशिवरात्रीला पूजा करण्याची परवानगी देण्याचे आश्वासन दिले आहे. पतित पावन संघटनेचे पुणे शहराध्यक्ष स्वप्नील नाईक यांनी म्हटले आहे की, महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय असंवैधानिक, बेकायदेशीर आणि प्रशासकीय मनमानी आहे. हा आदेश कोट्यवधी शिवभक्तांच्या श्रद्धेवर थेट आघात असल्याचे त्यांचे मत आहे. नाईक यांच्या मते, भारतीय संविधानाचे कलम २५ प्रत्येक नागरिकाला उपासनेचा मूलभूत अधिकार देते. सार्वजनिक सुव्यवस्थेच्या नावाखाली उपासनेवर पूर्ण बंदी घालणे हे प्रमाणबाह्य आहे. वेळापत्रकानुसार दर्शन, टप्प्याटप्प्याने प्रवेश, पोलीस बंदोबस्त आणि गर्दी नियंत्रण यांसारखे कमी निर्बंधात्मक उपाय उपलब्ध असतानाही पूर्ण बंदी म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. लाखो भाविक वर्षभर महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी नियोजन करतात. त्यांचे कष्ट, खर्च, उपास-तापास आणि भक्ती याकडे दुर्लक्ष करून मंदिर बंद ठेवणे म्हणजे श्रद्धेची गळचेपी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटनेने महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर तात्काळ खुले ठेवण्याची, विशेष सुरक्षा व गर्दी नियंत्रण आराखडा जाहीर करण्याची आणि बंदीचा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना स्वप्नील नाईक यांच्यासह मनोज पवार, स्वप्नील आंग्रे आणि राजाभाऊ रजपूत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *