युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडले:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- हा एकजुटीचा विजय




विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे. आता त्यावर पुढे काय निर्णय होती हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युवा पिढीच्या या आंदोलनाच्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे. युवा पिढीच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार म्हणाले, युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडले असून हे लोकशाहीच्या शक्तीचे प्रतीक आहे. हा देशातील युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय आहे. तसेच विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने युवकांना नैतिक पाठबळ दिले त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मी आभार मानतो. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे आणि त्याचे श्रेय देशातील युवकांना जाते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, संयमाने आणि शांततेने युवा पिढीने आपल्या भावना देशाच्या नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आले. मी स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की लोकशाहीत संवाद ठेवण्याची आवश्यकता असते. संवाद न ठेवणे, त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे मी काही सांगायची गरज नाही. तुम्ही हा डायलॉग सुरू ठेवला पाहिजे. एकतर राजीनामा दिला पाहिजे किंवा संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. शरद पवार म्हणाले, माझे जे काही बोलणे झाले पंतप्रधानांसोबत, त्याचे परिणाम मला दिसले. पहिल्या चर्चेत विद्यार्थ्यांच्या मागण्या काही मान्य झाल्या नव्हत्या. दुसऱ्या राऊंडला एक सोडून बाकीच्या मागण्या केंद्र सरकारने विचार करण्याची भूमिका घेतली आणि तरीही युवा पिढीचा आग्रह शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा होता, तो आग्रह शिक्षण मंत्र्यांनी स्वीकारला आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मी युवा पिढीचे पुन्हा अभिनंदन करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *