मतदानाआधीच ‘पैशांचा पाऊस’:छत्रपती संभाजीनगरात आरोपाने खळबळ, विकासाच्या गप्पा, पण पैशांचा पाऊस का? अंबादास दानवेंचा भाजपला थेट सवाल




छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज, 15 जानेवारी रोजी मतदान होत असून सकाळपासूनच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांनुसार 11 लाख 18 हजार 263 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र, मतदानाला काही तास शिल्लक असतानाच शहरातील काही भागांत पैसे वाटपाच्या आरोपांवरून जोरदार गदारोळ झाल्याचे चित्र दिसून आले. या कथित प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या कथित पैशांच्या वाटपावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी थेट भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दानवे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मी आज सर्वात आधी मतदान केले. आमचे मतदान हे निष्ठेचे आणि संघर्षाचे आहे, असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, त्याच वेळी त्यांनी भाजपच्या कथित कारवायांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अंबादास दानवे म्हणाले की, मला सकाळी चार वाजेपर्यंत सतत फोन येत होते. भारतीय जनता पार्टीने या शहरात कशा प्रकारे पैशांचा पाऊस पाडला जात आहे, याची माहिती लोक देत होते. भाजपवर थेट टीका करत त्यांनी भाजपला पैशाची मस्ती आली आहे, पैशाचा माज चढला आहे, असे कठोर शब्द वापरले. विकासाच्या नावावर मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या भाजपला मग मतांसाठी पैसे का वाटावे लागतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दानवे पुढे म्हणाले की, खऱ्या अर्थाने विकास केला असेल तर कामाच्या आधारावर मतं मागितली पाहिजेत. पण इथे तसं काहीच दिसत नाही. जनतेवर विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरची जनता सुज्ञ आहे आणि ती निश्चितपणे भाजपला त्यांची जागा दाखवून देईल. पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न लोकशाहीला घातक असल्याचा इशाराही त्यांनी दिला. याच वेळी अंबादास दानवे यांनी निवडणूक प्रशासन आणि निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव आहे. निवडणूक आयोग मात्र कुंभकर्णाची झोप घेत आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेत आयोग कुठेच दिसत नसल्याचा दावा करत, एकाच परिस्थितीत दोन वेगवेगळे निकष लावले जात असल्याचे त्यांनी सांगितले. एका बाजूला एका प्रकारचा न्याय, तर दुसऱ्या बाजूला वेगळा न्याय होत असल्यास मतदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. दानवे यांनी मतदारांना थेट साद घालताना सांगितले की, अशा एकांगी आणि दबावाखालील कारभारात मतदारांनी योग्य व्यक्तींच्या बाजूने न्याय दिला पाहिजे. लोकशाहीमध्ये मतदार हा सर्वात मोठा न्यायाधीश असतो आणि त्यानेच योग्य निर्णय घ्यायचा असतो, असे ते म्हणाले. निवडणूक आयोगाची निष्क्रियता आणि प्रशासनावरचा दबाव हा लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात 1150 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आठवण राज्यातील एकूण परिस्थितीवर भाष्य करताना अंबादास दानवे म्हणाले की, महाराष्ट्राला आज परिवर्तनाची नितांत गरज आहे. विकासाचा खोटा फुगा उभा केला जात आहे, असा आरोप करत त्यांनी राज्यातील वास्तव परिस्थिती समोर आणली. 2025 साली राज्यात 1150 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आठवण करून देत, विकासाच्या दाव्यांमागील वास्तव मतदारांनी ओळखावे, असे त्यांनी सांगितले. खोट्या आणि भ्रमिष्ट प्रचाराला बळी न पडता सजगपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. मतदानाच्या दिवशीच छत्रपती संभाजीनगरात उफाळलेले हे आरोप, प्रशासनावरचे प्रश्न आणि परिवर्तनाची हाक यामुळे निवडणूक अधिकच चुरशीची आणि चर्चेची ठरत आहे. आता मतदार नेमका कोणता निर्णय देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *