![]()
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदानानंतर मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई सहज पुसली जात असल्याचे अनुभव अनेक मतदारांनी सोशल मीडियावर मांडले आहेत. यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. मतदानापूर्वी पैसे वाटप, दुबार मतदार आणि बोगस मतदारांच्या आरोपांनंतर आता थेट मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नेहमीप्रमाणे मतदानानंतर न पुसली जाणारी विशेष शाई वापरण्याऐवजी यावेळी अनेक मतदान केंद्रांवर थेट मार्कर पेनने बोटावर निशाणी केल्याचे समोर आले आहे. हा मार्कर सहजपणे पुसता येत असल्याने दुबार मतदानाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा प्रकार केवळ काही ठिकाणी मर्यादित नसून मुंबईसह इतर शहरांमधूनही असे अनुभव समोर येत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या तयारीवर आणि नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सकाळी 9.30 वाजेपर्यंत केवळ 6.98 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील बालमोहन विद्यालय या मतदान केंद्रावर 20 मिनिटे ईव्हीएम मशीन बंद असल्याचा प्रकार घडला. या काळात एकही मतदान होऊ शकले नाही. त्यामुळे या केंद्रावरील मतदानाची वेळ वाढवण्यात आली. याच मतदान केंद्रावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मतदान असल्याची माहिती आहे. मशीनमधील मतदानाचे बटण दाबले जात नसल्याने अखेर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले. निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त या संपूर्ण प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले असून, पहिल्या फोटोत बोटावर स्पष्ट दिसणारी मार्करची निशाणी आहे, तर दुसऱ्या फोटोत ती निशाणी पूर्णपणे पुसलेली दिसते. दुर्गे यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगत निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे हा मुद्दा अधिकच तापला आहे. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना साईनाथ दुर्गे म्हणाले की, आज मतदान केल्यानंतर बोटावर शाईऐवजी मार्कर पेन वापरले जात आहेत आणि ही शाई सहज पुसली जातेय. शिवसैनिक, महाराष्ट्रसैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे. कोणीही या प्रकाराचा गैरफायदा घेत नाही ना, याकडे लक्ष द्यावे. गाफील राहू नका. त्यांच्या या आवाहनानंतर अनेक मतदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. निकाल लागण्यास उशीर होण्याची शक्यता दरम्यान, उद्या होणाऱ्या मतमोजणीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्व महानगरपालिकांची मतमोजणी उद्या सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा एक तास उशिरा म्हणजेच सकाळी दहा वाजता सुरू होणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मतदान आणि मतमोजणीदरम्यानचा कालावधी कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निकाल लागण्यास उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाडु मशीनचा मतदान प्रक्रियेशी कोणताही संबंध नसल्याचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाकडून शाईऐवजी मार्कर किट महत्त्वाचे म्हणजे, बोटावर शाईऐवजी मार्कर पेन वापरण्यात आल्याची बाब आता मुंबई महापालिका प्रशासनाने अधिकृतपणे मान्य केली आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाकडून शाईऐवजी मार्कर किट उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, नखांवर लावलेली ही मार्करची निशाणी पुसली जात असल्याची समस्या समोर आली आहे, हे त्यांनी कबूल केले. या कबुलीनंतर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि तयारीवर अधिकच संशय निर्माण झाला असून, हा मुद्दा निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बोटावरील निशाणी पुसली जात असल्याने आयोग अडचणीत:दुबार मतदानाचा धोका; मुंबई आयुक्त भूषण गगराणी यांनीही केले कबूल
