![]()
अमरावती जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या महिन्यापासून दरमहा प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची ही मागणी आता पूर्ण झाली असून, येत्या रविवारपासून बहुतेक रेशन दुकानांतून या नवीन धान्य वितरणाला सुरुवात होईल. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना दरमाणसी दरमहा ४ किलो तांदूळ आणि केवळ १ किलो गहू दिला जात होता. जिल्ह्यातील नागरिक भाताऐवजी पोळीला अधिक पसंती देत असल्याने, गव्हाचा पुरवठा वाढवण्याची मागणी वारंवार केली जात होती. स्थानिक जिल्हाधिकारी ते संबंधित खात्याचे मंत्री यांनाही याबाबत अवगत करण्यात आले होते, परंतु धान्य पुरवठ्याच्या सूत्रामध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. आता या महिन्यापासून जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती प्रतिमाह ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ पुरवले जाईल. जिल्ह्यात अंत्योदय वर्गवारीतील १ लाख २९ हजार ४६६ कार्ड्स असून, त्यातील लाभार्थ्यांची संख्या सुमारे ३ लाख आहे. त्याचवेळी, सर्व चौदाही तालुके मिळून प्राधान्य गटातील लाभार्थ्यांची एकूण संख्या १५ लाख ५६ हजार १६ आहे. अशाप्रकारे, रेशनचे धान्य घेणाऱ्या जिल्हाभरातील लाभार्थ्यांची संख्या १९ लाखांच्या आसपास आहे. या सर्वांना या महिन्यात प्रतिव्यक्ती प्रतिमाह ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारतर्फे अमरावती जिल्ह्याला १२ हजार २४२ टन धान्य पुरवठा करण्यात आला आहे. या निर्णयामुळे तांदळाच्या चोरट्या विक्रीला आळा बसेल, असे निवृत्त नायब तहसीलदार सुरेश उज्जैनकर यांनी सांगितले. भात खाण्याची सवय नसल्यामुळे रेशनच्या दुकानातून मिळणारा तांदूळ अनेक कार्डधारक खुल्या बाजारात विकत होते. कुटुंबाला लागणारा तांदूळ वगळता उर्वरित खेप राईस मिलर्स किंवा छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडे जात होती. हा चोरटा व्यवहार थांबवण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागालाही बरेच कष्ट घ्यावे लागत होते. आता ही कटकट बऱ्यापैकी कमी होईल, असे ते म्हणाले.
रेशन कार्डधारकांना दिलासा; गव्हाचा पुरवठा वाढला:प्रतिव्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ; या महिन्यापासून अंमलबजावणी
