![]()
राज्यातील सर्वच महानगरपालिकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असली, तरी पहिल्याच तासात निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आयोगाने यापूर्वी घेतलेल्या एकामागून एक निर्णयांमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच मोठ्या प्रमाणावर गैरव्यवस्थेचे चित्र समोर आले. अनेक ठिकाणी मतदार यादीतील नावांचा गोंधळ, ईव्हीएम मशीन बंद पडणे, बटणे काम न करणे अशा तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे मतदारांची मोठी हेळसांड झाली. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या या ढिसाळ कारभाराचा पहिला फटका थेट राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनाच बसला. नवी मुंबईत सकाळी साडेसातपासून मतदानासाठी बाहेर पडलेल्या गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबाला एक तास मतदान केंद्रांवर फिरावे लागले. दोन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नाव न सापडल्याने संभ्रम निर्माण झाला. अखेर कोपरखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूलच्या मतदान केंद्रावर गणेश नाईक, संजीव नाईक आणि सून कल्पना नाईक यांची नावे यादीत आढळली. मात्र, माजी महापौर सागर नाईक आणि त्यांच्या पत्नीचे नाव वेगळ्याच ठिकाणी असल्याचे समोर आले. त्यामुळे नेहमी एकाच ठिकाणी मतदान करणाऱ्या नाईक कुटुंबाला यावेळी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर जावे लागले. या प्रकारावरून यंत्रणा ‘टू द पॉइंट’ काम करत नसल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला. केवळ नवी मुंबईच नव्हे, तर मीरा-भाईंदरमध्येही मतदानाच्या सुरुवातीपासून गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदानाबाबत पुरेशी जनजागृती न झाल्याने अनेक मतदारांना आपले मतदान केंद्र नेमके कुठे आहे, याचीच माहिती नसल्याचे दिसून आले. परिणामी मतदार केंद्र शोधण्यासाठी इकडून तिकडे फिरताना दिसले. लालबाग चिवडा गल्ली येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन अर्धा तास उशिरा सुरू झाल्याने मतदारांचा संयम सुटला. यावेळी ठाकरे गटाचे नेते सुधीर साळवी यांनाही मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्येही मतदानाच्या सुरुवातीलाच गोंधळ उडाला. गुजराती कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ते दुरुस्त करण्यास जवळपास एक तास लागला. या काळात नागरिकांना मतदान केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागले. सकाळी लवकर मतदानासाठी आलेल्या मतदारांचा खोळंबा झाल्याने आयोगाच्या तयारीवरच प्रश्न उपस्थित झाले. सोलापूरमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली. संगमेश्वर पब्लिक स्कूलमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रिया थांबली होती. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र जवळपास पाऊण तासानंतरच मशीन सुरू होऊ शकली. या विलंबामुळे मतदान प्रक्रियेत मोठा खोळंबा झाला आणि मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. मुंबईतही मतदान केंद्रांवर गोंधळाची दृश्ये दिसून आली. कुर्ला पूर्व येथील कामगार नगरमधील पंत वालालवकर शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांची नावे, मतदान केंद्र आणि बूथ बदलल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. अनेक मतदारांनी नाव शोधण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला. नाव यादीत असूनही योग्य बूथची माहिती न मिळाल्याने मतदारांमध्ये असंतोष पसरला. नागपूरमध्येही ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड नागपूरमध्येही मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होण्यास विलंब झाला. प्रभाग क्रमांक 28 मधील आराधना नगर येथील जीआरके कॉन्व्हेंटमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुमारे 40 मिनिटे मतदान थांबले होते. मशीन बदलल्यानंतरच मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये मतदानाची सुरुवातच बंद किंवा बिघडलेल्या मशीनमुळे झाल्याने, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका होत आहे. मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांची झालेली हेळसांड पाहता, निवडणूक आयोगाच्या या कारभाराचं करायचं तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
नाव गायब, मशीन बंद; राज्यभर मतदानाचा गोंधळ:मतदानाऐवजी मनस्ताप; आयोगाच्या निर्णयांचा फटका थेट मतदारांना
