![]()
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथे जुनी पाईपलाईन अनेक ठिकाणी लिकेज झाल्यामुळे नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून गढूळ आणि दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्या
.
गावातील नळांद्वारे येणारे पाणी दूषित असल्याने नागरिकांनी याबाबत चार महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. गावातील सजग नागरिक आणि काही संस्था-संघटनांनीही यावर आवाज उचलला होता. मात्र, अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. विशेषतः, वॉर्ड क्रमांक ३ मध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याचे निदर्शनास आले आहे.
काही नागरिकांच्या मते, अनेक ठिकाणी घरगुती नळांना पुरेसे पाणीही मिळत नाही. जलस्वराज्य-२ योजना कार्यान्वित असताना पाणीपुरवठा सुरळीत होता, परंतु गेल्या पाच वर्षांपासून पाण्याची टंचाई आणि नळ येण्याच्या वेळेत अनियमितता वाढली आहे. गटविकास अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांचे नियंत्रण ढासळल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे.
या गंभीर समस्येची अमरावतीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठ्याची सोय करावी, अशी मागणी जोर धरत आहे. संताजी जगनाडे तैलिक समितीचे अध्यक्ष गणेश नवखरे, उपाध्यक्ष सौरभ भांडे आणि सचिव रोशन जुमळे यांनी याबाबत ग्रामप्रशासनाला लेखी तक्रार दिली आहे.
या संदर्भात, जिल्हा परिषद, अमरावतीचे उपविभागीय अभियंता संजय घाणेकर यांनी सांगितले की, त्यांना तक्रारीची माहिती मिळाली आहे. ते स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना कळवून दोष दुरुस्तीच्या सूचना देतील.
ग्रामपंचायतीमध्ये पाणीपट्टीची वसुली केवळ ५० टक्केच झाली आहे. यामुळे प्रशासनावर आर्थिक ताण येत असून, उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही, पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने यावर खर्च करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
