Ladakh Kargil India’s Soul LG Kavinder Gupta Award Ceremony | लडाख, कारगिल भारताचा आत्मा – नायब राज्यपाल कविंदर गुप्ता: सरहदतर्फे लडाख महोत्सव, कारगिल गौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान – Pune News


लडाख आणि कारगिल या केवळ भारताच्या सीमा नसून, त्या भारताचा आत्मा आहेत. लडाखमध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे भारताशी लडाखचे नाते अतूट आहे, असे प्रतिपादन लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी केले.

.

‘सरहद, पुणे’ संस्थेच्या वतीने आयोजित लडाख महोत्सवांतर्गत ‘कारगिल गौरव नॅशनल अवॉर्ड २०२५’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना कविंदर गुप्ता यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, लडाखच्या प्रथम नागरिक बिंदू गुप्ता, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, सुषमा नहार, अर्हम इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश पगारिया आणि संवाद फाउंडेशनचे संजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोकरे, मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, ज्येष्ठ आर्किटेक्ट दिलीप काळे, सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख, निर्भय भारत फाउंडेशनचे संचालक तरुण उत्पल आणि राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

गुप्ता पुढे म्हणाले की, लडाख भावनात्मकतेने भारताशी अखंड जोडलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या हिवाळ्यात काही काळ हा भूभाग विलग होत असला तरी, भारताशी लडाखचे नाते कायम अतूट राहते. लडाखच्या सीमाक्षेत्रात शिक्षण, क्रीडा आणि इतर अनेक क्षेत्रांत विकासाची कामे सुरू आहेत. ‘सरहद’सारख्या संस्थांचे या विकासातील योगदान मोलाचे आहे.

राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम कारगिल येथील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होतो, असे गुप्ता यांनी सांगितले. राष्ट्राची सुरक्षा केवळ युद्धभूमीवरच नव्हे, तर नागरिकांच्या सहभाग आणि सहकार्यावर अवलंबून असते. कारगिल युद्धात नागरिकांनी कोणत्याही स्वार्थाशिवाय सैन्याला मोठी मदत केली होती, असे त्यांनी नमूद केले.

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात सध्या सुरू असलेले ऐतिहासिक परिवर्तन आपण पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे लष्कराचे मनोबल उंचावले आहे. सीमाक्षेत्रांचा विकास होत असून, तिथे आवश्यक सुविधा मिळत आहेत. केवळ सुरक्षेच्या दृष्टीने नव्हे, तर सन्मान आणि विकासाच्या दृष्टीने लडाख व कारगिलकडे पाहिले जात असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भूभाग देशाचा सन्मान आहेत आणि प्रत्येक नागरिकाला त्यांचा अभिमान आहे. ‘सरहद’च्या माध्यमातून अनेक वर्षांपासून तिथे सातत्याने सुरू असलेले काम अद्वितीय आहे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. विस्तारवादाचा धोका भविष्यात वाढत जाणार असल्याने देशातील नागरिकांनी एकत्र येऊन उभे राहणे गरजेचे आहे. आपण एक आहोत ही भावना प्रबळ करण्यासाठी काश्मीर आणि लडाखमध्ये सातत्याने जायला हवे.

प्रास्ताविक करताना संजय नहार यांनी सरहदच्या वाटचालीचा आढावा घेतला ते म्हणाले, सरहदने गेल्या अनेक वर्षांपासून सीमावर्ती भागात चांगले काम केले आहे. हे काम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार आहे. लवकरच पुण्यामध्ये लडाख भवन आणि कारगील भवन उभारण्यात येणार आहे. मिनी काश्मीर उभे करण्याचाही प्रयोग पुण्यात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *