![]()
सध्या देशभरात आणि राज्यात ‘जातनिहाय जनगणने’च्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात असतानाच, आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. “काँग्रेसने सलग ६५ वर्षे देशावर राज्य केले, मग तेव्हा त्यांनी जातनिहाय जनगणना का केली नाही? आधी त्या ६५ वर्षांचा हिशोब द्या आणि आता सुरू असलेली नौटंकी बंद करा,” असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे. सोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून भाजपचे सरकारच ही जनगणना करणार असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला आहे. ‘तुमची सत्ता होती, तेव्हा का गप्प होता?’ पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली. राहुल गांधी आणि काँग्रेस नेते सध्या ज्या आक्रमकतेने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरत आहेत, त्याचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, “केंद्रात तब्बल ६५ वर्षे काँग्रेसचीच सत्ता होती. तेव्हा तुम्हाला ओबीसींची किंवा जातनिहाय जनगणना करावीशी का वाटली नाही? त्यावेळी तुम्ही संविधानात संशोधन करून हा निर्णय का घेतला नाही? सत्तेत असताना काहीही करायचे नाही आणि आता विरोधात गेल्यावर फक्त राजकारणासाठी नौटंकी करायची, हे काँग्रेसने आता बंद करावे.” ‘भाजपच करणार जातनिहाय जनगणना’ यावेळी बोलताना बावनकुळे यांनी भाजपची आणि केंद्र सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली. ते म्हणाले की, “भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आणि सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय घेतात. भाजपचे सरकारच देशात जातनिहाय जनगणना करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसा निर्णय घेतला असून, हे सर्व काम टप्प्याटप्प्याने चालणार आहे. आता ही या प्रक्रियेची सेकंड फेज आहे.” ‘दरड कोसळणे ही नैसर्गिक घटना; नुकसानाची दुरुस्ती होणारच’, बावनकुळेंचे स्पष्टीकरण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याच्या घटनेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत ही नैसर्गिक घटना असल्याचे म्हटले. “दरड कोसळण्याला सरकार जबाबदार नाही. दरड कोसळल्यामुळे झालेले नुकसान निश्चितपणे दुरुस्त केले जाईल. कोणतेही मोठे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ‘डिफेक्ट लायबिलिटी पीरियड’ असतो. या कालावधीत तांत्रिक त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेकडून त्याची दुरुस्ती केली जाते. याच प्रक्रियेनुसार या प्रकरणातही आवश्यक काम केले जात आहे,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. मान्सूनचे रौद्ररूप:मुंबई, पुण्यात पावसाचे थैमान; 90 किमीच्या वाऱ्याने उडवली दाणादाण; 8 जुलैपर्यंत घराबाहेर पडू नका- मुख्यमंत्र्यांचे आवाहन १६ दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन केलेल्या मान्सूनने मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत थैमान घातले. त्यामुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. ९० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने २९१ झाडे उन्मळली. ८ जुलैपर्यंत नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सविस्तर वाचा नाशिक येथे ढगफुटीचा इशारा, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद:हवामान खात्याने जारी केला हाय अलर्ट; शाळा – कॉलेज बंद सलग होणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने या भागात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील २४ तासांत ३०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दरम्यान ढगफुटीची शक्यताही वर्तवली आहे. पावसामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, काल रात्रीपासून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, मेटघर किल्ला परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सविस्तर वाचा
65 वर्षांचा हिशोब द्या, नौटंकी बंद करा:जातनिहाय जनगणनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात
