![]()
इमारतींची अत्यंत जीर्ण झालेली अवस्था, सुरक्षेचे गंभीर प्रश्न आणि राज्यातील इतर कारागृहांतून कैदी पळून जाण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत राज्य शासनाने अखेर जामखेडचे दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार गुरुवारी, ९ जुलै रोजी जामखेडमधील सर्व ६२ आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) स्थलांतरित करण्यात आले. यापुढे जामखेड परिसरातील सर्व न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा मुक्काम नाशिकमध्येच असणार आहे. राज्य शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आणि धोकादायक ठरत असलेल्या राज्यातील एकूण ११६ दुय्यम कारागृहांचे टाळे कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या जुन्या कारागृहांच्या भिंती आणि बॅरेक्स कमकुवत झाल्यामुळे तेथे आधुनिक सुरक्षा यंत्रणा (सीसीटीव्ही, वॉच टॉवर) उभारण्यात अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेचा कोणताही धोका पत्करायचा नाही, या हेतूने जामखेड कारागृहातील ५९ पुरुष व ३ महिला अशा एकूण ६२ कैद्यांना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या मोठ्या ताफ्यातून नाशिककडे रवाना करण्यात आले. स्थलांतराच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कारागृह आणि स्टेशन परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आरोपींना नाशिकला घेऊन जात असताना त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने कारागृहाबाहेर जमले होते. आपल्या माणसाला परजिल्ह्यात नेले जात असल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते, ज्यामुळे कारागृहाबाहेर भावनिक वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करत प्रक्रिया यशस्वी ही संपूर्ण हाय-प्रोफाइल स्थलांतर प्रक्रिया जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. सर्व प्रशासकीय आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करत अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने सर्व कैद्यांना नाशिक सेंट्रल जेलच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
जीर्ण इमारत अन् सुरक्षेचाच खोळंबा; जामखेडचे कारागृह कायमस्वरूपी बंद:62 कैद्यांना नाशिक जेलमध्ये हलवले; कारागृहाबाहेर नातेवाईकांची गर्दी
