![]()
तालुक्याची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाणाऱ्या अंजनी धरणातून रब्बी हंगामातील पहिले सिंचन आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आवर्तनामुळे गहू, ज्वारी, हरभरा व मका आदी प्रमुख रब्बी पिकांना आवश्यक ओलावा मिळणार असून एकूण ३५० हेक्टर
.
हे हंगामातील पहिलेच आवर्तन असून डाव्या कालव्यातून ४० क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनामुळे पळासदळ, नंदगाव, टोळी, बोरगाव बांभोरीपर्यंतच्या शेतजमिनी ओलिताखाली येणार आहेत. वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची वाढ जोमाने होईल, उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सिंचनाचे पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अनेक शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या सुरक्षित झाल्याची भावना व्यक्त केली आहे. विशेषतः हरभरा व गहू पिकांना या टप्प्यावर पाण्याची गरज असल्याने हे आवर्तन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
काही भागांमध्ये वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे कालव्यात पाणी असूनही शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पंपाद्वारे पाणी उपसा करून पाईपलाईनने नेण्याची वेळ येत आहे. भविष्यात कालवा वितरण प्रणाली मजबूत करण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अंजनी धरणाच्या उजव्या कालव्याच्या पहिल्या आवर्तनासाठी अद्याप लाभार्थी शेतकऱ्यांकडून पाण्याचे मागणी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे ते आवर्तन तात्पुरते स्थगित ठेवण्यात आले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने पाण्याचे अर्ज सादर करावेत, जेणेकरून शेत शिवारापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचून अधिक क्षेत्र ओलिताखाली येईल, असे आवाहन एरंडोल गिरणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी कुलदीप पाटील यांनी केले.
