![]()
तालुक्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली असली, तरी पहिल्या दमदार पावसानंतर एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली आहेत. तालुक्यात सुमारे ९७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा
.
एरंडोल तालुक्यात पहिल्या पावसाने शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण केल्यामुळे बळीराजाने वेगाने पेरण्या उरकल्या. चालू हंगामात तालुक्यात अबालवृद्धांसह सर्वच शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण करत एकूण ३२ हजार १६४ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची यशस्वी पेरणी केली आहे. सध्या पिकांच्या उगवणीचा अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक टप्पा सुरू आहे. मात्र, नेमक्या याच काळात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांची वाढ खुंटण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.पहिल्या पावसाच्या विश्वासावर केलेली ही गुंतवणूक आता धोक्यात आली आहे. जर पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पिके जळून खाक होतील आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवेल.
दुबार पेरणीची टांगती तलवार : पहिल्या पावसाच्या जोरावर तालुक्यात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असली, तरी आता पाऊस गायब झाला आहे. कडक ऊन आणि ओलाव्याची कमतरता यामुळे बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होत असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. महागाईच्या या काळात शेतकऱ्यांनी पदरमोड करत, महागडी बियाणे, खते खरेदी करून आणि मशागतीचा मोठा खर्च करून पेरणी केली आहे.
