![]()
पुणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने १२० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. “आमच्या मित्रपक्षाला वाटले होते की आम्ही ४० उमेदवारही उभे करू शकणार नाही, पण आम्ही काही तासांतच १२० जणांना ताकद दिली,” अशा शब्दांत उदय सामंत यांनी भ
.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यात शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि अजित पवार गटावर शालजोडीतले टोले लगावल, पुण्याचा पुढचा महापौर शिवसेनेच्या मदतीशिवाय होऊ शकणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर १२० जागांवर निवडणूक लढवत आहे.
नेमके काय म्हणाले उदय सामंत?
उदय सामंत म्हणाले, “आपला पक्ष पुण्याच्या विकासावर बोलणारा आहे, त्यामुळे आपण कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही. टीका करण्याचे काम आमचे मित्र अजित पवार पूर्ण करत आहेत, त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आपण केवळ आपल्या विकासकामांनी उत्तर द्यायचे आहे.”
उदय सामंत म्हणाले, १६ तारखेला जेव्हा निकाल लागेल, तेव्हा महापौर ठरवण्यासाठी शिवसेनेला विचारात घेतल्याशिवाय कोणालाही पर्याय उरणार नाही. आम्ही अनेक तरुण आणि नवे चेहरे दिले आहेत. पुणेकरांचा आशीर्वाद तरुणांच्या पाठीशी असतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पुणे ही कोणा एका पक्षाची मक्तेदारी नाही, हे पुणेकर या निवडणुकीत दाखवून देतील.
युती तुटण्यावरून भाजपवर निशाणा
भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे ही टिकली पाहिजे असे आमचे म्हणणे होते. पण काही लोकांचा गैरसमज होता की, आम्ही ४० देखील उमेदवार उभे करू शकणार नाही. आम्हाला वेळ कमी पडला, नाहीतर आपण १६५ उमेदवार उभे केले असते, असा टोला उदय सामंत यांनी भाजपला लगावला.
पाच वर्षात १६५ पैकी १२० जागा जिंकू
निवडणुकीचे सगळे निर्णय आपण एका तासात घेतले आहेत. पुण्यात जर आपण ताकद लावली तर एक नंबरचा पक्ष शिवसेना असेल. पण काही लोक कमी लेखत आहेत, त्यांच्यावरती बोलायला नको. आज अशी निवडणूक लढू की पाच वर्षात १६५ पैकी १२० जागा आपण जिंकल्या पाहिजे. पुण्यात शिवसेनेची खरी ताकद काय आहे हे दाखवून द्या. पुढचे 14 दिवस अहोरात्र काम करा, असे आवाहन सामंत यांनी शिवसैनिकांना केलं.
‘शिवशक्ती’ विरुद्ध ‘धनशक्ती’ असा सामना
पुण्यातील लढाई ही केवळ जागांची नसून ती विचारसरणीची असल्याचे सामंत यांनी सुचवले. “आमच्या समोर मोठी धनशक्ती आहे, पण आमच्याकडे ‘शिवशक्ती’ आणि जनतेचा विश्वास आहे. ही लढाई विकास विरुद्ध विश्वासघात अशी आहे,” असे म्हणत त्यांनी निवडणुकीचे स्वरूप स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे घराघरांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा कायापालट करण्यासाठी पुणेकरांनी एकदा महापालिका आमच्या ताब्यात द्यावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
