राम मंदिरात 14 हजार कोटींची लूट:संजय राऊतांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांनाही लगावला टोला




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. रामरक्षा म्हणणाऱ्यांनीच राम मंदिरातील साडेपाचशे कोटींची दानपेटी फोडून १४ हजार कोटी लुटले, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आधी या चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी १४ जुलै रोजी नागपुरात माध्यमांशी बोलताना केली. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर आणि केदारनाथ-बद्रीनाथमधील कथित लुटीविरोधात ढोंगी हिंदुत्ववाद संपवण्यासाठी १८ जुलै रोजी नागपुरात दुपारी ४:३० वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘हिंदू जागृती’ आंदोलन होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरची निवड या आंदोलनासाठी करण्यात आली आहे. हे आंदोलन कोणा व्यक्तीविरोधात नसून जनहितासाठी आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. राम हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असल्याने आम्ही यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वतः देवेंद्र फडणवीस त्या दिवशी घरी असतील तर त्यांनाही आमंत्रित करणार आहोत, असे राऊत म्हणाले. राऊत यांनी राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेत ९२ लाख बोगस लाभार्थी असल्याचा आरोप करत, हा देशातील सर्वात मोठा घोटाळा सिद्ध होईल, असा दावा केला. मंत्रालयात रामरक्षा म्हणून हा घोटाळा लपवता येणार नाही, असे ते म्हणाले. तसेच, लडाखचे अभ्यासक सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवर जाऊन पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंना केले. पक्षांतराबाबत बोलताना, मूळ पक्षात विलीन झाल्याशिवाय त्या ६ आमदारांना कोणताही अधिकार नसून, संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार त्यांची आमदारकी रद्द होणार असल्याने ते घरचे ना घाटचे राहतील, असा टोला त्यांनी लगावला. राम मंदिराच्या पादुका, सिंहासन आणि भाविकांचे सोने लुटणाऱ्यांच्या चौकशीऐवजी केंद्र सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही बेळगावच्या बैठकीत या चोरीबाबत केवळ दुःख व्यक्त केल्याचे राऊत यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *