मुंबईत धावत्या इलेक्ट्रिक बेस्ट बसला भीषण आग:पश्चिम द्रुतगती महामार्गावरील घटना; प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला




मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’च्या ताफ्यातील एका इलेक्ट्रिक बसला कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. कांदिवलीतील साईधाम मंदिर परिसरात ही दुर्घटना घडली असून, सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टची 289 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस दामू नगर परिसरातून प्रवाशांना घेऊन बोरिवलीच्या दिशेने निघाली होती. बस अंधेरीकडून बोरिवलीकडे जात असताना पश्चिम द्रुतगती महामार्गावर अचानक बसमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. ही घटना कांदिवली येथील साई धाम मंदिराजवळ घडली. ज्यावेळी आग लागली, त्यावेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. आगीची चाहूल लागताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली, मात्र चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना तातडीने बसबाहेर काढण्यात आले. संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी ही आग लागल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आगीमुळे कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि जोगेश्वरी दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले, तरी ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर तांत्रिक कारणामुळे, याचा तपास अग्निशमन दलाचे जवान आणि समता नगर पोलिस करत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यामुळे इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *