![]()
श्री समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थळ असलेल्या सज्जनगडावर दि. 2 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दासनवमी महोत्सवाची आज (दि. 11) सांगता झाली. यात्रेचा आजचा मुख्य दिवस होता. उद्या सकाळी लळीताचे कीर्तन होऊन या यात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान, गेल्या नऊ दिवसांपासून गडावर रामनामाचा गजर सुरू होता. अनेक नामवंतांची कीर्तन, प्रवचन, भजन गायन सेवा गडावर सुरू होती. आज पहाटे दोन वाजता समाधी मंदिरात काकड आरती, यानंतर पहाटे चार वाजता श्री समर्थ समाधी महापूजा, सकाळी साडेसहा वाजता सज्जनगड गावातून सांप्रदायिक भिक्षा असे कार्यक्रम पार पडले. विशेष पूजामध्ये समर्थांची समाधी फुलांनी सुशोभित करण्यात आली होती. तसेच समाधीचे वरील बाजूस मोगऱ्याच्या फुलांच्या माळा लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. समर्थ समाधीवरील श्रीराम मूर्तीनाही फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती. समाधी मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगेने समर्थ भक्तांना शिस्तबद्धपणे सोडण्यात येत होते. सांप्रदायिक भिक्षेमध्ये समर्थ रामदास स्वामींचे वंशज तसेच महंत, मठपती, मानकरी उपस्थित होते. नंतर सकाळी साडेदहा वाजता आरती, छबीना मानाच्या १३ प्रदक्षिणा संपन्न झाल्या. यावेळी रामा, रामा हो रामा.. असे पद म्हणत रामदास स्वामी संस्थान, श्री समर्थ सेवा मंडळचे पदाधिकारी, मानकरी तसेच हजारो समर्थ भक्त मंदिराला प्रदक्षिणा घालताना एक वेगळाच नजारा पाहायला मिळत होता. दुपारी बारा वाजता श्री समर्थ निर्वाण कथा समर्थ भक्त सुरेशबुवा सोन्ना रामदासी यांनी कथन केली. दुपारी साडेबारा पासून श्री रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने महाप्रसादाच्या आयोजन केले होते. रात्री साडेनऊ वाजता कीर्तन सेवा संपन्न झाली. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडच्या वतीनेही श्रीधर कुटी येथे दैनंदिन उपासना, श्रीधर स्वामींच्या पादुकांना अभिषेक दासबोध पारायण आदि कार्यक्रम करण्यात आले. तसेच भक्तनिवास येथे सुरू असलेल्या श्री समर्थ दासबोध ग्रंथ पारायणाची सांगता करण्यात आली. विद्याधर बुवा वैशंपायन व रसिकाताई ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पारायण गेली नऊ दिवस सुरू होते त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. गुरुनाथमहाराज कोटणीस यांनी दासनवमी या विषयावर सुश्राव्य असे प्रवचन केले.
जय जय रघुवीर समर्थ…!:सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, लळीताच्या कीर्तनाने होणार समारोप
