![]()
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी दावा केला आहे की अजित पवारांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा होती. तशी चर्चा देखील झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेत्यांनी अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. या सगळ्यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, विलीनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करून घेतले नव्हते. मी त्या चर्चेचा भाग नव्हतो. त्यामुळे विलीनीकरणाबाबत मला काहीही माहित नाही. मी कुठल्याही बैठकीत सामील नसेल तर मला कुठलीही माहिती देण्यात आली नाही. हे कृपया टीव्हीवर दाखवा, असे आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले, गेल्या अनेक दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारात व्यस्त असल्याने त्यांची माझी भेट झाली नव्हती. अनेक काम पेंडिंग आहेत. त्या पेंडिंग कामासंदर्भात भेट घ्यायला आलो होतो. तसेच त्यात राजकीय काही चर्चा झाली नाही. मतदारसंघातील काही निर्णय घ्यायचे होते ते निर्णय घ्यावेत आणि ते लवकरात लवकर घ्यावेत यासाठी मी त्यांच्याकडे आलो होतो, असे आव्हाड म्हणाले. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते कोण असेल याबाबत विचारले असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजून त्यावर विचार केलेला नाही. अजून त्याच्यावर चर्चा नाही, निर्णय नाही. अत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटले असते, याच्यावर राजकारण चालत नाही. तसेच मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी महायुतीला समर्थन दिल्याच्या मुद्द्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे, ते एकटेच निवडून आले होते. त्यांनी वैयक्तिक निर्णय घेतला आहे, असे आव्हाड म्हणाले. संशय व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार अजित पवारांच्या अपघातावर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शंका व्यक्त केली आहे. विमानात बॉम्ब होता का? असा संशय त्यांनी व्यक्त केला. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, संशय व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. संशय कोणाला कशाचाही येऊ शकतो, त्याला काय करणार आपण? असे आव्हाड यांनी म्हटले. तसेच अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या संशयावर बोलताना आव्हाड म्हणाले, कोणीतरी संशय घेणार, कोणीतरी खोडून काढणार. त्याच्यावर मी उत्तर देत बसलो तर तुम्हालाही वेळ कमी पडेल, मलाही वेळ कमी पडेल. शरद पवारांचा राज्यसभा कार्यकाळ संपणार आहे, याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, आता मधल्या बातम्या एवढ्या तुमच्याकडे आहेत तर मला कशाला प्रश्न विचारता. पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे, असे जर हक्काने सांगता मग प्रश्न मला विचारून काय फायदा? मी तर त्या पक्षाचा पण नाही. तसेच पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडी कडे तेवढी सदस्य संख्या नक्की आहे, एक खासदार जाऊ शकतो, असेही आव्हाड म्हणाले. मला राष्ट्रीय अध्यक्ष करणार नाहीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा शरद पवार यांना शह असल्याचे वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी केले होते. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, राम कदम हे भाजपचे आहेत, त्यांना आतमधली माहिती असू शकते. मला माहित नाही. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला काय करायचे आहे, मी काय त्या पक्षाचा अध्यक्ष होणार नाही, मला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचे नाही, मला करणारही नाहीत. तसेच कोण अध्यक्ष होणार हे मी संध्याकाळपर्यंत विचार करून सांगतो, असेही आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मला माहित नाही:मी कुठल्याही चर्चेत सहभागी नव्हतो, जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितले
