![]()
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी करताना अर्जात तांत्रिक किंवा माहितीविषयक चुका केल्या होत्या, त्यांना आता आपली माहिती सुधारण्यासाठी ३१ मार
.
लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर पात्र महिलांची खातरजमा करण्यासाठी राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी बंधनकारक केली होती. लाभार्थी महिलांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना “लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित, कायमस्वरूपी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत नाही, तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तिवेतन घेत नाही” या अटीसंदर्भात ऑनलाइन पर्याय निवडताना काही प्रकरणांत चुकून चुकीचा पर्याय निवडला गेल्याचे निदर्शनास आले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- कुणाला सुधारणा करता येईल? ज्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण केले आहे, पण माहिती भरताना चूक झाली आहे.
- अंतिम मुदत: दुरुस्तीसाठी ३१ मार्च २०२६ ही शेवटची तारीख असेल.
- कुठे कराल दुरुस्ती? योजनेच्या अधिकृत पोर्टलवर यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्रुटी दूर करण्याचे आवाहन
यापुढे कोणत्याही परिस्थितीत अर्जात सुधारणा करण्याची पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पात्र महिलांनी ही शेवटची संधी समजून आपल्या अर्जातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे. आतापर्यंत १ कोटी ५७ लाख महिलांनी ई-केवायसी केली असून तांत्रिक अडचणीमुळे २५ लाख महिलांची ई-केवायसी अर्धवट राहिली आहे, असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजकीय टायमिंग आणि ‘व्होट बँक’वर नजर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अगदी आदल्या दिवशी असा दिलासादायक निर्णय येणे, हे निव्वळ योगायोग मानणे कठीण आहे. अर्जातील तांत्रिक चुकांमुळे ग्रामीण भागातील मोठा महिला वर्ग नाराज होऊ शकला असता. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि लाभार्थी मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी ही ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ मास्टरस्ट्रोक ठरू शकते. प्रशासकीय सुधारणेच्या नावाखाली मतदारांना आश्वासित करण्याचा हा एक धोरणात्मक राजकीय प्रयत्न वाटतो, असे राजकीय विश्लेषणांचे म्हणणे आहे.
