आमदारांना मंत्रिपदे, मग मला काय ?- जंजाळ:संभाजीनगरात शिरसाटांचा विरोध डावलून जंजाळांवर शिक्कामोर्तब




मनपाच्या उपमहापौरपदासाठी अखेर राजेंद्र जंजाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उद्धवसेनेतून उपमहापौरपद सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या जंजाळांना दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. जंजाळांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर पक्षश्रेष्ठींना नमते घ्यावे लागल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. शुक्रवारी (६ फेब्रुवारी) सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्र जंजाळांना फोन करून उमेदवारीबाबत चर्चा केली. या वेळी जंजाळ यांनी थेट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. “पक्षात आलेले सर्व आमदार मंत्री झाले, मात्र मी उपमहापौरपद सोडून तुमच्यासोबत आलो होतो. मला आतापर्यंत काय मिळाले? असा रोखठोक सवाल त्यांनी केला. आपल्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात सहा आमदार निवडून आणल्याचा आणि लोकसभा निवडणुकीतील यशाचा दाखलाही त्यांनी दिला. जंजाळांच्या या भूमिकेला संदिपान भुमरे आणि प्रदीप जैस्वाल यांनीही पाठबळ दिल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर मोहोर उमटवली. शिरसाटांचा विरोध ठरला निष्फळ जंजाळांच्या नावाला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे जंजाळांविरोधातील वातावरणाची माहिती देत आपली नाराजी स्पष्ट केली. मात्र, जंजाळांचे नाव अंतिम झाल्याने शिरसाटांचा विरोध डावलला गेला. “मी पक्षासमोर माझी भूमिका मांडली आहे, आता पक्षाने निर्णय घेतला आहे,’ अशी सूचक प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. या निर्णयामुळे जंजाळांचे राजकीय पुनर्वसन झाले असले तरी शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाची धार यानिमित्ताने पुन्हा एकदा तीव्र झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *