गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या:दिलगिरी व्यक्त करताना म्हणाले- मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो; नव्या वादाला सुरुवात




नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने निर्माण झालेला वाद शांत होण्याऐवजी अधिकच पेटताना दिसत आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मंत्री गिरीश महाजन यांनी, मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो, 40 वर्षांत अंगात निळा शर्ट घातला नाही असं कधी झालंय का? असे वक्तव्य केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. दिलगिरी व्यक्त करूनही अशा विधानांमुळे समाजात संभ्रम आणि संताप वाढत असून, महाजनांच्या या वक्तव्यावरून राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने उपस्थितांमध्ये असंतोष निर्माण झाला. विशेष म्हणजे, कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने थेट जाहीरपणे आक्षेप घेत संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात? असा सवाल केल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. या घटनेचे पडसाद आता नाशिकपुरते मर्यादित न राहता राज्यभर उमटू लागले असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याबाबत जाहीरपणे आक्षेप नोंदवला. त्यांच्या या कृतीमुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला आणि दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या कारवाईनंतर नागरिक आणि विविध संघटनांनी पोलिस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी या घटनेला गंभीर स्वरूप देत महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. अशा महामानवाचा उल्लेख टाळला जाणे हे अपमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. या मागणीनंतर राजकीय वातावरण अधिक तापले असून, महाजन यांची अडचण वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, मला आज खूप वाईट वाटले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी नेहमीच पुढाकार घेतो. अनेक नेते हार घालून निघून जातात, पण मी आमच्या गावात आणि तालुक्यात जयंती कार्यक्रमात उपस्थित राहतो. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या चाळीस वर्षांत त्यांनी कधीही बाबासाहेबांचा अपमान होईल असे वर्तन केलेले नाही. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून, मातंग समाज, वाल्मिकी समाज यांच्यासाठी आपण सातत्याने काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गिरीश महाजन यांनी हेही स्पष्ट केले की, मी संघाच्या संस्कारात वाढलेला आहे. गावात पंगत देतो, सर्व समाजातील लोकांसोबत जेवायला बसतो. मी बाबासाहेबांचे विचार जपणारा आहे. भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख अनवधानाने राहिला असेल, पण यावरून एवढा गदारोळ कशासाठी, हे मला समजत नाही. त्यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करत दिलगिरी व्यक्त केली. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर त्यांनी प्रश्न उपस्थित करत, कशासाठी ॲट्रॉसिटी? असा सवालही केला. या प्रकरणानंतर वन विभागातील कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. शासकीय कार्यक्रमात एका महिला कर्मचाऱ्याने थेट मंत्र्यांना जाब विचारण्याचे धाडस केल्याने ही घटना विशेष चर्चेत आहे. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ विविध सामाजिक संघटना आणि नागरिक रस्त्यावर उतरल्याचेही पाहायला मिळाले. सामाजिक आणि राजकीय वादाचे रूप एकीकडे गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांच्या वक्तव्यावर आणि भूमिकेवर विरोधकांकडून टीकेची झोड उठत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात न होणे ही केवळ चूक नसून ती मानसिकतेचे प्रतीक असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, सामाजिक आणि राजकीय वादाचे रूप घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या काळात या प्रकरणात पोलिस आणि प्रशासन काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *