बाळासाहेब ठाकरे नव्हे तर मोदी-शहा शिंदे गटाला वंदनीय:संजय राऊतांची टीका; मात्र, गिरीश महाजनांसह, अमृता फडणवीसांची बाजू घेतली




शिंदे शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी करत थेट पुढाकार घेतला आहे. आज शिंदे सेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच मुद्द्यावरून सकाळीच खासदार संजय राऊत यांनी शिंदे सेनेवर आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबईचा महापौर भाजपचाच होईल आणि शिंदे सेना निमूटपणे त्याला पाठिंबा देईल, असा थेट दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. शिंदे सेनेच्या स्वतंत्र गट नोंदणीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिंदे शिवसेनेवर कडवट शब्दांत हल्ला चढवला. शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच वंदनीय आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती दिवस रुसून बसणार? फारतर एखादी साडी-चोळी पदरात पाडून घेतील, असा जहरी टोला राऊतांनी लगावला. कोश्यारी यांच्याबाबतच्या वक्तव्यांवरूनही संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना विरोध करणे, महात्मा फुले यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणे हे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संकुचित वाटत असेल, तर मी त्यांना कोपरापासून दंडवत घालतो, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असताना फडणवीस यांनी त्यांची बाजू घेतली, ही दिल्लीचीच जबाबदारी होती, असा आरोपही त्यांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे यांना शिंदे सेनेत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले. यावर संजय राऊत यांनी हा दावा साफ फेटाळून लावला. अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी कधीही पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. उलट, उदय सामंत हे स्वतः एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली, हे तुम्हाला माहिती आहे का? असा पलटवारही राऊतांनी केला. यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता आणि संभाव्य घडामोडींच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. महापौरपदाच्या तिढ्याबरोबरच भाजपवर सन्मान आणि पुरस्कारांवरूनही राऊतांनी निशाणा साधला. महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपचे सरकार बसवणाऱ्यांना मोदी सरकारकडून पद्मभूषण देण्यात येतो. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला, त्यांचा भाजप सन्मान करतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. अमृता फडणवीस यांच्यावरील वक्तव्यावर भाष्य करताना त्यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह बोलणे चुकीचे असल्याचेही नमूद केले, मात्र गमछा घातला नाही म्हणून टीका करणे हा भाजपचा खेळ आहे, अशी टीका करत भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *