![]()
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी बंडखोरी करत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता लोकसभा सचिवालयाने या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. लोकसभा अध्यक्षांनी या 6 बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी हा निर्णय देण्यात आला. बंडू जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाघचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील या सहा खासदारांचा निर्णय लोकसभा सचिवालय यांच्याकडे प्रलंबित होता. आज दिवसभर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र पार पडले. त्यानंतर आता सायंकाळी लोकसभा सचिवालयाकडून बुलेटिन जारी करत, उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 6 बंडखोर खासदारांच्या एकनाथ शिंदेंच्या पक्षातील विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांची संख्या अधिकृतपणे १३ झालेली आहे. या फुटीर खासदारांच्या गटाचे नेते म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांची घोषणा करण्यात आलेली आहे. शिंदेंच्या एका कॉलमुळे 6 खासदार बंडखोर उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. 9 पैकी फक्त 4 खासदार पोहोचले. तेव्हाच पक्षात मोठी फूट पडणार हे निश्चित झाले. 16 जून रोजी 6 खासदार दिल्लीला पोहोचले आणि 17 जून रोजी लोकसभा अध्यक्षांना भेटले. त्याच दिवशी बातम्या आल्या की, संजय दीना पाटील आणि ओमप्रकाश निंबाळकर हे दोन खासदार 18 जून रोजी पुन्हा शिवसेना (उद्धव गट) च्या संसदीय बैठकीत जाऊ शकतात, परंतु सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झूम कॉन्फरन्स कॉलवर सर्व खासदारांशी संवाद साधला आणि ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये विलीन होण्यास तयार झाले. उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याची 2 प्रमुख कारणे 1. पक्षात संजय राऊत आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप. बंडखोर खासदारांनुसार, संजय यांचे नेत्यांसोबतचे वर्तन योग्य नाही, पण उद्धव त्यांच्या विरोधात काहीही ऐकत नाहीत. 2. खासदारांना आपल्या संसदीय मतदारसंघात कामासाठी निधी मिळत नाही. पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यास आणि क्षेत्रांना भेट देण्यास सांगितले, पण काहीही झाले नाही.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का:बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी
