आयुर्वेदाला जागतिक ओळख मिळतेय:भारतीय आयुर्वेद संस्थेच्या धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात बिहारचे राज्यपाल खान यांचे प्रतिपादन




आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाचे महत्त्व वाढले असून, त्याला जागतिक स्तरावर ओळख मिळत आहे, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी केले. भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद संभाषा परिषद आणि राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. राज्यपाल खान म्हणाले की, आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून, ती एक भारतीय जीवनदृष्टी आहे. जागतिक पातळीवर आयुर्वेदाला अधिक विश्वासार्हता मिळवून देण्यासाठी संशोधन, प्रमाणबद्धता आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरणावर भर देणे आवश्यक आहे. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या डॉ. शिरामाने सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. राज्याच्या आरोग्य शिक्षण विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वैद्य रणजीत पुराणिक, वैद्य जीवन बच्छाव (आयआरएस), वैद्य संतोष नेवपूरकर, वैद्य प्रशांत बागेवाडीकर, वैद्य वंदना सिरोहा, वैद्य अनिल बनसोडे, वैद्य प्रियदर्शिनी कडूस आणि वैद्य किरण पंडित यांना ‘आयुर्वेद गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या परिषदेदरम्यान, विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. वैद्य किरण पंडित यांनी आयुर्वेद शिक्षण व्यवस्था, तिची व्याप्ती आणि राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. विश्वानंद आयुर्वेद चिकित्सालय व गुरुकुलचे संचालक वैद्य अनिल बनसोडे यांनी ‘आयुर्वेद प्रॅक्टिस कशी उभारावी व वाढवावी?’ यावर प्रात्यक्षिकांसह विश्लेषण केले. श्री आयुर्वेद अँड हॉस्पिटलचे संचालक वैद्य प्रशांत दौंडकर-पाटील यांनी ‘आयुर्वेद ओपीडी, हॉस्पिटल नोंदणी, ओपीडी व आयपीडी पंचकर्मासाठी कॅशलेस मेडिक्लेम एम्पॅनेलमेंट’ याविषयी मार्गदर्शन केले. श्री धूतपापेश्वरचे सीईओ वैद्य रणजीत पुराणिक, आयुर्वेद व्यासपीठाचे माजी अध्यक्ष वैद्य संतोष नेवपूरकर, बागेवाडीकर आयुर्वेद रसशाळेचे संचालक वैद्य प्रशांत बागेवाडीकर आणि आयुष मंत्र्यांचे खासगी सचिव वैद्य जीवन बच्छाव यांनीही आपले विचार मांडले. या मान्यवरांनी आयुर्वेद क्षेत्राचा आजवरचा प्रवास, आधुनिक वैद्यक शास्त्रात आयुर्वेदाची भूमिका, वैद्यांसमोरील आव्हाने व अडचणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या जागतिक पातळीवरील विविध संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले. वैद्य हरीश पाटणकर आणि वैद्य प्रेरणा बेरी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी पुढे सांगितले की, शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी आयुर्वेदाची संकल्पना आजच्या तणावपूर्ण काळात अत्यंत उपयुक्त ठरत आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत आयुर्वेदाची भूमिका भविष्यात निर्णायक ठरू शकते. त्यामुळे आधुनिक विज्ञानाशी समन्वय साधत आयुर्वेदातील मूलतत्त्वे जपण्याची गरज असून, तरुण वैद्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत संशोधनाकडे वळावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *