आधी स्वतःची पात्रता तपासा, जिभेला लगाम लावा:विजय शिवतारेंवर रोहित पवारांचा पलटवार; खंडोबा मंदिरावरून राजकीय युद्ध




राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली असून, शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यात जोरदार शाब्दिक संघर्ष रंगला आहे. विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केल्यानंतर हा वाद अधिक चिघळला. शिवतारेंच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून, त्यांनी शिवतारेंवर जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विजय शिवतारे यांनी आपल्या टीकेत शरद पवार आणि अजित पवार यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीवर बोट ठेवले होते. शरद पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले. या काळात त्यांनी राज्यातील अनेक देवस्थानांना देणग्या दिल्या, मात्र पुरंदर तालुक्यातील खंडोबा मंदिर आणि त्या परिसराच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, असा आरोप शिवतारेंनी केला. त्यांनी पुरंदरच्या विकासाबाबत दुर्लक्ष झाल्याचा थेट आरोप करत पवार कुटुंबावर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी अत्यंत कठोर शब्दांत विजय शिवतारे यांच्यावर निशाणा साधला. तीन वेळा आमदारकी आणि पाच वर्षे मंत्रीपद भूषवूनही स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करता न आलेल्या आमदाराला आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा यांच्यावर टीका करण्याची राजकीय पात्रता आहे का, हे आधी तपासायला हवं, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. शिवतारेंनी केलेली टीका ही त्यांच्या स्वतःच्या कामगिरीवर पडलेली पांढरी फाशी असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. रोहित पवार यांनी जेजुरी गडाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत शिवतारेंच्या आरोपांना उत्तर दिले. श्रीक्षेत्र जेजुरी गडासाठी अर्थसंकल्पात घोषणा करून 350 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्याचे काम अजित पवार यांनीच केले, हे शिवतारे विसरले असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यामुळे विकासासाठी निधी दिला नाही, हा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टीका करताना शिवतारेंनी जिभेला लगाम लावावा, अन्यथा पोपटासारखं मिठू.. मिठू बोलणाऱ्यांचं पुढे काय होतं, याचा अनुभव त्यांना आधीच आलेला आहे, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला. रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, विजय शिवतारे यांनी आज जी टीका केली आहे, ती प्रत्यक्षात त्यांच्या स्वतःच्या नाकर्तेपणाची कबुली आहे. ज्या पक्षाने त्यांना आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं, त्याच पक्षाला त्यांनी फसवलं. त्यामुळे अशा व्यक्तीकडून विकासाची अपेक्षा तरी काय करायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवतारेंनी केलेली वक्तव्ये ही केवळ राजकीय अस्वस्थतेतून आलेली असून, त्याला कोणताही ठोस आधार नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. नेतेच दळभद्री, असे आक्षेपार्ह विधान केल्याने वाद दरम्यान, विजय शिवतारे यांनी नेमकं काय म्हटलं होतं, यावरही आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शिवतारे यांनी आरोप करताना म्हटलं होतं की, शरद पवार आणि अजित पवार यांनी दीर्घकाळ सत्तेत असताना अनेक देवस्थानांना मदत केली, मात्र पुरंदरमधील खंडोबा मंदिर आणि त्या भागाचा विकास त्यांच्या प्राधान्यक्रमात नव्हता. टीका करताना त्यांच्या शब्दांची मर्यादा सुटली आणि त्यांनी थेट नेतेच दळभद्री, असे आक्षेपार्ह विधान केल्याने वाद अधिक पेटला. त्यांनी गेल्या पन्नास वर्षांत पुरंदर परिसराचा विकास झाला नसल्याचा दावाही केला. शाब्दिक युद्धाचे पडसाद राज्याच्या राजकारणात शिवतारे यांनी सध्याच्या काळात सुरू असलेल्या विकासकामांचा दाखला देत, आता पुरंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे दुपदरीकरण आणि इतर पायाभूत सुविधा उभारल्या जात असल्याचे सांगितले. ही कामे आताच होत असल्याने, पवारांच्या कार्यकाळात या भागाकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. मात्र, या आरोपांना रोहित पवार यांनी जोरदार उत्तर दिल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. आता या शाब्दिक युद्धाचे पडसाद राज्याच्या राजकारणात किती दूरवर उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *