नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवक सत्यपाल सावंत यांचा पुढाकार; डॉ. आंबेडकर नगरातील तुंबलेली ड्रेनेज लाईन केली मोकळी


नांदेड(प्रतिनिधी)- प्रभाग क्रमांक ८ शिवाजीनगर परिसरात स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत काँग्रेसचे नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामात उतरून आदर्श निर्माण केला. डॉ. आंबेडकर नगर परिसरातील ड्रेनेज लाईन अनेक दिवसांपासून तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येत होते. दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. या समस्येची माहिती मिळताच नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून तातडीने ड्रेनेज लाईनची साफसफाई करून घेतली.

गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज तुंबल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावर साचलेले सांडपाणी, अस्वच्छ वातावरण आणि डासांची वाढ यामुळे नागरिकांमध्ये रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी कोणतीही दिरंगाई न करता संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून साफसफाईचे नियोजन केले आणि काम पूर्ण होईपर्यंत स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून देखरेख केली.

साफसफाईच्या कामामुळे तुंबलेली ड्रेनेज लाईन मोकळी झाली आणि परिसरातील साचलेले सांडपाणी वाहू लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी नगरसेवकांनी केवळ सूचना देण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

या वेळी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनीही नगरसेवक सत्यपाल सावंत यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. बहुतांश वेळा लोकप्रतिनिधी कामाची सूचना देऊन निघून जातात; मात्र सावंत हे काम पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांसोबत उभे राहून त्यांना आवश्यक सहकार्य करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही काम करण्याचा उत्साह वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, रस्त्यांची स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत नगरसेवक सावंत सातत्याने लक्ष देत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच विविध उपक्रम राबविले असून नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

डॉ.  आंबेडकर नगरातील ड्रेनेज लाईनची समस्या मार्गी लागल्यानंतर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वच्छ परिसरामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, भविष्यातही अशाच पद्धतीने विकासकामे आणि स्वच्छता मोहिमेला प्राधान्य देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. नगरसेवक सत्यपाल सावंत यांनीही प्रभागातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही दिली.


Post Views: 630






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *