एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर 2 दिवसांत कळेल:सतेज पाटलांचा टोला; मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीत होणार असल्याचा दावा




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत किती बार्गेनिंग पॉवर शिल्लक आहे हे पुढील दोन दिवसांत कळेल, असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे. पण हे पद कुणाला द्यायचे याचा निर्णय दिल्लीतच होणार आहे. तिथे शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कळेल, असे ते म्हणाले. आज मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत झाली. या सोडतीनंतर कोल्हापुरात बोलताना सतेज पाटील म्हणाले, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहे. पण मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय दिल्लीतच होईल. सत्ताधारी शिवसेना किती दबावाखाली आहे हे मागील 2-3 दिवसांत घडलेल्या घटनांवरून दिसून येते. शिंदेग टाची बार्गेनिंग पॉवर अजून शिल्लक आहे का? हे दोन दिवसांत कळेल. कोल्हापूर महापालिकेचे महापौरपदही शिवसेनेला मिळणार नाही. मिळालेच तर त्यांचे अभिनंदन करायला हवे. सरकार म्हणेल तसे नियम, कायदे सुरू ते पुढे म्हणाले, महापालिका निवडणुकीनंतर महापौर पदाचे आरक्षण असा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. नियम व कायदे सरकार म्हणेल तसे सुरू आहे. आज सोडत झालेले महापौर पदाचे आरक्षण मागील आरक्षण पाहून झाले आहे का? याची खात्री कोर्टाने केली पाहिजे. जिल्हा परिषदांच्या आरक्षणावेळी हा विचार झाला नव्हता. कोल्हापूर महापालिकेत शिंदे गटाला महापौर पद मिळणार नाही. यदाकदाचित त्यांना मिळाले तर त्यांचे कौतुकच करायला हवे. महायुतीमधील घटकपक्ष अनेक ठिकाणी निवडणूकपूर्व व निवडणूकीनंतर युती करून एकत्र आलेत. त्यामुळे महापौर निवडीत काही गडबड होईल असे वाटत नाही. कोल्हापूर व इचलकरंजी या दोन्ही ठिकाणी ओबीसी आरक्षण पडले आहे. आता दोन्ही ठिकाणी मूळ भाजपचा महापौर होणार की नव्याने भाजपमध्ये आलेला महापौर होणार याची उत्सुकता कोल्हापूरकरांना लागली आहे. 20 वर्षे आमच्यविरोधात लढलेल्या कार्यकर्त्याला पद मिळते की नवख्याला? हे आम्हालाही पाहायचे आहे, असेही सतेज पाटील यावेळी भाजपवर निशाणा साधताना म्हणाले. भाजपचे स्थानिक नेते सक्षम नाहीत काँग्रेस महापौर पदाची निवडणूक लढवणार किंवा नाही याचा निर्णय निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घेतला जाईल. या प्रकरणी सर्वांना विश्वासात घेतले जाईल. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. येथे काँग्रेसचे 35 उमेदवार विजयी झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत राज्यातील 29 महापालिकांचे आरक्षण निघाले आहे. कोल्हापूरच्या महापौर पदाचा निर्णयही मुख्यमंत्री घेणार असतील तर इथले नेते सक्षम नाहीत हेच यावरून स्पष्ट होते, असेही सतेज पाटील यावेळी भाजप नेत्यांवर निशाणा साधताना म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *